बीड (वृत्तसंस्था) बीडच्या केज (Beed- Kej) तालुक्यातील लव्हूरी गावच्या ऊसतोड मजूर पुरवठा अधिकाऱ्याचे अपहरण करून कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात हत्या करण्यात आली आहे. सुधाकर उर्फ सुदाम हनुमंत चाळक (वय ५८, रा. लव्हुरी, ता. पिंजरा, जि. बीड) असे मृताचे नाव आहे.
मयत सुधाकर चाळक हे उस्मानाबाद जिल्ह्यात असणाऱ्या, महालक्ष्मी साखर कारखाना येथे मजूर पुरवठा अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांचे 16 फेब्रुवारी रोजी बीडच्या वडवणी शहरातून अपहरण केलं. मात्र अनेक दिवसांपासून घरी न आल्याने, 25 फेब्रुवारी रोजी त्यांच्या नातेवाईकांनी चाळक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
27 फेब्रुवारी रोजी त्यांचा भाऊ आणि मुलं यांना, चाळक यांच्या फोनवरून अज्ञात लोकांनी फोन केला. अपहरणकर्ते हे सुधाकर चाळक यांच्या सुटकेसाठी 12 लाख रुपयांची मागणी करीत आहेत. तसेच त्यांना अमानुष मारहाण करीत असल्याचा कॉल रेकॉर्डिंगचा आवाज ऐकू येत असून सुधाकर चाळक हे मारहाणीमुळे विव्हळत असल्याचे देखील, त्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे. यावेळी अपहरणकर्त्याला त्यांचा मुलगा हा मारहाण न करण्याची विंनती करीत आहे. तरी देखील ते अमानुष आणि बेदम मारहाण करीत आहेत.
दरम्यान चाळक यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. शीर धडावेगळे करून मृतदेह पोत्यात गुंडाळून, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात असणाऱ्या नांगनूर येथील हिरण्यकेशी नदीत फेकून दिला होता. पोलिसांनी शोधमोहीम राबविल्यानंतर मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी दत्तात्रय हिंदुराव देसाई वय 58 रा. कडगाव ता.भुदरगड, तुकाराम मुंढे वय 52 रा. चारदरी ता. धारूर जि. बीड, रमेश मुंढे वय 45, रा. कोठारबन ता. वडवणी जि. बीड, यांना केज पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या घटनेने बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून एकच खळबळ उडाली आहे.