नागपूर (वृत्तसंस्था) आर्थिक चणचण आणि घरगुती वादातून पती-पत्नीनं टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनास्थळी सुसाईड नोट आढळली असून, त्यातून आत्महत्येचं कारण समोर आलं आहे. नागपुरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरी नगर परिसरात ही घटना घडली आहे. मनोज (वय ५०) आणि ममता लोधी (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या दाम्पत्यानं आर्थिक चणचण आणि घरगुती वादातून गळफास घेऊन जीवन संपवलं. नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरी नगरात हे दाम्पत्य राहत होतं. मनोज लोधीचे जुने वाहन खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय होता. मूळचे गोंदियाचे राहणारे होते. कोरोना काळात त्यांच्या व्यवसाय ठप्प झाला होता. काही काळ त्यांना पॅरालिसिस झाला होता. आर्थिक चणचण होती. त्यात घरमालकाने भाडे आणि पाणी बिलाच्या रकमेसाठी त्यांच्याकडे तगादा लावला होता, अशी माहिती समोर येत आहे. आर्थिक चणचण आणि घरगुती वादामुळे लोधी दाम्पत्याने गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.