जळगाव (प्रतिनिधी) भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत असताना एका शेतकऱ्याने कीटकनाशक औषधी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
योगेश पाटील असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. ‘माझ्या शेतातील २० हजार केळीच्या झाडांचे वादळात पूर्ण नुकसान झाले आहे. पण नेतेमंडळी बांधावर येऊन साधी पाहणी करायला तयार नाही’, अशी उद्विग्नता व्यक्त करत त्याने टोकाचे पाऊल उचलले.
योगेश पाटील हा मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवे येथील रहिवासी आहे. मेळसांगवे शिवारात त्याची केळीची शेती आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे त्याच्या शेतातील सुमारे २० हजार केळीच्या झाडांचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तालुक्यात पाहणी दौरा केला. त्यावेळी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र, त्यानंतरही योगेश पाटील याच्या शेतीचे पंचनामे झाले नाहीत. त्यानंतर आज (मंगळवारी) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी तालुक्याच्या दौर्यावर आले आहेत. त्यांनी देखील रस्त्यावरील शेतांची धावती पाहणी करून काढता पाय घेतला. आपल्या शेतात पाहणी केली नाही म्हणून त्याचा संताप अनावर झाला. देवेंद्र फडणवीस यांचा ताफा उचंदा परिसरातून रस्त्यावरून जात होता. तेव्हा योगेश पाटील हा ताफ्यासमोर आडवा झाला. त्याने हातात विषाची बाटली घेतली होती. विष प्राशन करणार तोच, पोलिसांनी धाव घेऊन त्याच्या हातातून विषाची बाटली हिसकावल्याने अनर्थ टळला.
यावेळी योगेश पाटील याने तीव्र संताप व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस हे फक्त फोटोसेशन करायला या ठिकाणी आलेले आहेत. या दौऱ्यातून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही. राज्यात यापूर्वी भाजपचे सरकार असतानाही केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली होती. आता राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे तर अतिशय निष्क्रिय आहे. शेतकऱ्याला एक रुपयाची देखील आर्थिक मदत मिळणार नाही, असा संताप त्याने व्यक्त केला.
दरम्यान, त्याआधीही खासदार रक्षाताई खडसे यांच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतली. त्यानंतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी निघाले असता परिवर्तन चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांचा ताफा अडवला.
















