जळगाव (प्रतिनिधी) शेतातून घरी जात असताना शरद समाधान पाटील (वय ४०, रा. उमाळे, ता. जळगाव) या शेतकऱ्यास भरधाव वाहनाने धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी होवून त्यांचा उपचारापुर्वीच दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जळगाव-जामनेर रस्त्यावरील उमाळा गावाजवळ घडली. धडक दिल्यानंतर वाहन चालक तेथून पसार झाला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील उमाळे गावात शरद पाटील हे वास्तव्यास असून ते आई, वडील पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्यास होते. शेती काम करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. नेहमीप्रमाणे बुधवारी शरद पाटील शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. सायंकाळी शेतातून दुचाकीने घरी परतत असताना जळगाव-जामनेर रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, शरद पाटील गंभीर जखमी होऊन जागेवरच कोसळले. दुचाकीस्वार शरद पाटील यांना धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.
उपचारापुर्वीच मालवली प्राणज्योत
अपघाताची माहिती मिळताची परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी अवस्थेतील शरद पाटील यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत शरद पाटील यांना मयत घोषीत केले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला
कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर
शरद पाटील हे शेती करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. दुर्देवी काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्याची आई सुपडाबाई, वडील समाधान, पत्न आशा, मुलगी केतकी आणि मुलगा मनोज असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.