धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील लहान माळीवाडा परिसरात राहणारे 41 वर्षीय शेतकरी राजेंद्र भगवान महाजन यांनी कर्जबाजारीपणाच्या मानसिक त्रासातून आत्महत्या केली. त्यांनी आपल्या राहत्या घरातील मागील खोलीत पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. ही घटना मंगळवारी (दि. 13 मे) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली.
राजेंद्र महाजन हे गारखेडा शिवारातील स्वतःच्या शेतात शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यावर खासगी व बँकेचे कर्ज होते. कर्ज फेडता न आल्यामुळे ते नेहमीच चिंताग्रस्त असत, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. घटनेनंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, धरणगाव येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात वृद्ध आई गंगुबाई महाजन, पत्नी सुरेखा महाजन, दोन मुलं आणि संपूर्ण कुटुंब शोकाकुल झाले आहे.
या प्रकरणी विठोबा दगा महाजन (वय 39, व्यवसाय: शेती, रा. लहान माळीवाडा, धरणगाव) यांच्या खबरीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आणि कर्जाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.