धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव पाणीपुरवठा योजना मुख्य जलवाहिनी रोटवद गावाजवळ लिकेजमुळे मागील काही वर्षापासून रोटवद येथील शेतकरी बेजार झाला आहे. तक्रार करूनही कुणीही दखल घेत नसल्यामुळे अखेर त्रस्त शेतकऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. परंतु धरणगाव पोलिसांनी मध्यस्ती केल्याचे उपोषण टळले असून पालिकेने पाणी लिकेजची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.
या संदर्भात अधिक असे की, धावडा ते धरणगाव मुख्यपाईप लाईन गळती बंद करण्यासाठी आमरण उपोषणासाठी शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते. त्या निवेदनात म्हटले होते की, रोटवद ता. धरणगाव येथील रहिवासी गेल्या 3 ते 4 वर्षापासून धावडा ते धरणगाव मुख्यपाईप लाईनला लिकेजल्यामुळे त्रस्त आहेत. घराच्या व शेतात आजूबाजूला पूर्णपणे पाणी साचले आहे. घराच्या अवतीभवती पाणी साचल्यामुळे डासाचे प्रमाण वाढून रोगराई वाढत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे घरे पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शेतात पाणी साचल्यामुळे पिकाचे नुकसान होत असून आर्थिक झळ सोसावी लागत आहे. त्यासाठी वेळोवेळी नगरपालिकेत तक्रारी दिल्या आहेत. परंतु मुख्याधिकारी आमची दखल घेण्यास तयार नाही म्हणून त्रस्थ नागरिकांनी 9 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता.
धरणगाव पोलिसांची मध्यस्थी
आज सकाळी गावकरी जेव्हा उपोषणासाठी आले तेव्हा धरणगाव पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत आपल्या कर्मचाऱ्यांना पालिकेत पाठवले आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यानंतर पालिका प्रशासनाने गावकऱ्यांना लेखी आश्वासन देत समस्या पुढील काही सोडवू असे म्हटले आहे. दरम्यान, जर धरणगाव पालिकेने आधीच उपोषणाची दखल घेतली असती तर आज रोटवदच्या शेतकऱ्यांना इतक्या मनस्ताप सहन करत आमरण उपोषणाचा इशारा द्यावा, लागला नसता.
पालिकेने गावकऱ्यांना दिलेल्या आश्वासनात नेमकं काय म्हटलंय ?
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत धरणगाव नगरपरिषद पाणीपुरवठा योजना (वाढीव वितरण व्यवस्था) ता धरणगाव जि. जळगाव प्रकल्पास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत एकूण रक्कम रु 27,44,06,275/- मात्रचा प्रकल्प मंजुर झालेला आहे. सदर प्रकल्पातील उपांगापैकी मुख्य जलवाहीनी धावडा ते धरणगाव जलशुध्दीकरण केंद्रापावेतो आवश्यक ठिकाणी लिकेज काढणेचे काम मंजुर झालेले आहे. सदर कामासाठी दिनांक 10 जून 2022 रोजी पाईप व आवश्यक साहित्य पुरवठा होणार असून दिनांक 11 जून 2022 रोजी पासून सदर लिकेज काढणे, पाईप लाईन बदलणे व इतर आवश्यक कामास सुरवात होणार आहे.
सदर कामास सुरवात झालेपासून विनाव्यत्यय सदर काम पुढील पंधरा दिवसात पुर्ण करणे नियोजित आहे. तरी समस्थ ग्रामस्थांना याव्दारे विनंती करणेत येते कि, आपल्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणेस धरणगांव नगरपरिषदेस यश आलेले असून पुढील दिवसांत आपल्या गावाजवळील लिकेजची समस्या कायमस्वरुपी संपणार आहे. तरी आपण उपोषणाबाबत दिलेले निवेदन मागे घ्यावे.