जळगाव प्रतिनिधी : इफको संस्थेच्या “नॅनो खते शेतकरी जागृती मोहीम” चे उद्घाटन रोहन घुगे, जिल्हाधिकारी जळगाव यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याअंतर्गत जळगाव जिल्ह्यात गावोगावी नॅनो खतांचा प्रचार प्रसार आणि नॅनो डीएपी बीज प्रक्रिया डेमो शेतकऱ्यांपर्यंत करणार आहे. सध्या जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती आणि अलनिनो सारखी संकटे उभी असताना शेतकऱ्यांनी पिकांची उत्पादकता शाश्वत ठेवण्यासाठी पर्यावरण पूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खते – नैनो युरिया, नॅनो डीएपी, नॅनो झिंक, नॅनो कॉपर यासारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे फायद्याचे ठरेल. भारतातील सर्वात जास्त रासायनिक खते वापरणाऱ्यापैकी एक जळगाव जिल्ह्याची ओळख आहे परंतु शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामात 25% रासायनिक खतांचा वापर कमी करून त्या ऐवजी पर्यावरण पूरक आणि जास्त कार्यक्षम नॅनो खते यांचा जास्तीत जास्त वापर शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. ही खते पर्यावरण पूरक आणि पारंपारिक रासायनिक खतांपेक्षा जास्त कार्यक्षम अशी आहेत.
याप्रसंगी कुर्बान तडवी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव, पद्मनाभ मस्के, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव, इफकोचे जळगाव जिल्हा प्रबंधक, संदीप रोकडे, इ.अधिकारी उपस्थित होते. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या नत्राच्या पुरवठ्यासाठी युरिया या खताचा प्रामुख्याने वापर शेतकरी करतात. परंतु या युरिया खताचा अतिरेक आणि अशास्त्रीय पद्धतीने वापर होत असल्यामुळे तो जमिनीला आणि पर्यावरणाला घातक ठरू लागला आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा प्रशासन यांनी युरियासारख्या रासायनिक खतांचा अवाजवी वापर शेतकऱ्यांनी कमी करावा असे आवाहन केलेले आहे.
शेतकऱ्यांनी वापरलेल्या युरियामुळे पिण्याच्या पाण्यातील “नायट्रेट” चे प्रमाण वाढत आहे. शेतकरी जेव्हा पारंपारिक युरिया शेतामध्ये टाकतात तेव्हा शेतातील पाण्यासोबत युरियाची अभिक्रिया होऊन त्यातून सर्वप्रथम “अमोनियम” हे संयुग तयार होते. हे संयुग जमिनीमध्ये अस्थिर असते आणि नैसर्गिकरित्या जमिनीमध्ये असणाऱ्या नायट्रोसोमोनास नावाच्या जिवाणूमुळे “नायट्राइट” या घटकांमध्ये रूपांतरित होते. यानंतर लगेचच नायट्रोबॅक्टर नावाच्या आणखी एका जिवाणूमुळे नायट्राईट चे रूपांतर “नायट्रेट” या आयनांमध्ये होते. सर्व पिके नत्र हे याच नायट्रेट स्वरूपात घेतात. म्हणजेच जेव्हा युरिया नायट्रेट स्वरूपात येतो तेव्हा पिकांची मुळे त्याला अन्न म्हणून शोषून घेतात. हा नायट्रेट घटक आयन स्वरूपात असल्यामुळे जमिनीमध्ये अतिशय जास्त चल स्वरूपात असतो. जमिनीमध्ये ओल जास्त असेल तर हा नायट्रेट घटक मुळांपासून दूर खोल जमिनीमध्ये पाण्यासोबत झिरपून जातो आणि जमिनीतील भूगर्भातील पाण्यामध्ये मिसळतो. तसेच तो नाले, ओढा यांच्यामार्फत नद्यांमध्ये देखील मिसळतो. याला लिचींग असे म्हणतात.
एका बाजूला युरियाच्या विघटन प्रक्रियेमुळे पिकांना नत्र उपलब्ध होते तर दुसऱ्या बाजूला पिण्याच्या पाण्याचे त्याच नायट्रेटमुळे प्रदूषण होते.
तसेच पारंपरिक युरिया विरघळून त्याचे नायट्रेट या रूपात रूपांतरित होत असताना त्यातील नत्र अमोनिया आणि नायट्रस ऑक्साईड या वायू मधून हवेत पसरले जाते त्यामुळे हवेचे देखील प्रदूषण होते. त्यामुळे शेतकरी बंधूंनी पारंपारिक युरियाचा वापर शिफारस केलेल्या खतमात्रेप्रमाणे आणि शास्त्रीयदृष्ट्या जास्त कार्यक्षम पद्धतीने करणे ही काळाची गरज बनलेली आहे.
या परिस्थितीवर उपाय म्हणून इफको मार्फत “नॅनो युरिया” (द्रवरूप) या जगातील पहिल्या नॅनो खताचे निर्माण करण्यात आलेले आहे. नॅनो युरिया मधील नत्राच्या अतिसूक्ष्म कणांमध्ये 20% नत्र असते. नॅनो युरियाची फवारणी केल्यानंतर पिकाच्या पानांच्या पेशीमधील पोकळीमध्ये नत्राचे नॅनो कण साठवून ठेवले जातात आणि पिकाच्या गरजेनुसार त्याचे विघटन नायट्रेटमध्ये पिकाच्या आत पेशीमध्ये केले जाते. त्यामुळे नॅनो युरियातील कोणताही घटक पाणी, हवा किंवा जमिनीमध्ये मिसळत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची कोणतेही प्रदूषण होत नाही. तसेच हवेचे आणि जमिनीचे देखील प्रदूषण होत नाही आणि नत्राची कार्यक्षमता 90% पर्यंत वाढली जाते जी पारंपारिक युरियाच्या बॅगेमध्ये 25 ते 30 टक्केच असते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पारंपारिक युरियाचा वापर 25% कमी करून केंद्र सरकारने अनुमोदित केलेले नॅनो युरियाचा वापर वाढवावा जेणेकरून आपल्या जमिनीचे, पाण्याचे आणि पर्यावरणाचे प्रदूषण न होता आपल्या पिकांची उत्पादकता भावी पिढीसाठी शाश्वत राहील.
















