मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर – बऱ्हाणपूर रोडवरील इंदूर ७५३ रस्त्याच्या कामादरम्यान भरधाव डंपरने मोटरसायकलला धडक दिली. त्यात दोन आदिवासी युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १२ मे रोजी रात्री ११.३० वाजता स्मशानभूमीजवळ घडली. दरम्यान, डंपरला रक्ताचे डाग नाही, असे सांगत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला.
राजकुमार गोपाल बारेला (वय १८) व राहुल गणपत ठाकूर (वय १६, दोघे रा. जुना पिंपरी रोड, मुक्ताईनगर) हे शेतीचे काम आटोपून एमपी. ६८-झेडडी ८१६० क्रमांकाच्या दुचाकीने घरी जात होते. त्यावेळी चुकीच्या दिशेने आलेल्या डंपरने त्यांना धडक दिली. त्यात दुचाकीवरील राजकुमार व राहुल या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही मूळचे रोहिणी (ता. नेपानगर) येथील रहिवासी होते. त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून मुक्ताईनगरात शेतीकामासाठी वास्तव्यास आहे.
पोलिस ठाण्यात ठिय्या
अपघातानंतर आदिवासी बांधवांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी ‘डंपरला रक्ताचे डाग नाहीत’, असे कारण देत गुन्हा दाखल करण्यात वेळकाढूपणा केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. डंपर चालक व मालक बी. एन. अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा पवित्रा घेत नातेवाइकांनी ठिय्या मांडला
आमदारांनी विचारला जाब
ही माहिती मिळताच आ. चंद्रकांत पाटील पोलिस ठाण्यात आले. गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली. रात्री बंदी असताना डंपरसारखी वाहने कशी धावतात? पोलिस निरीक्षक व तहसीलदारांनी त्यास आळा घालावा. गुन्हा दाखल करावा, असे सांगितले. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होत नसल्याने मुक्ताईनगर विधानसभेचे आ. चंद्रकांत पाटील थेट पोलीस ठाणे मध्ये पोहोचले. अपघात केलेले डंपर हे बी. एन. अग्रवाल यांच्या मालकीचे असून सूर्यास्तानंतर डंपरला परवानगी नसताना सर्रास वाहतूक सुरू आहे. आमदार पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित डंपर मालक व चालकावर मोठी कारवाई करून ३०४ अ प्रमाणे कारवाई करावी तसेच तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी सूर्यास्त नंतर सुरू असलेल्या डंपर वर कारवाई करण्याची मागणी ही आ. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. तसेच अपघातग्रस्ताच्या नातेवाईकांना आ. चंद्रकांत पाटील यांनी दिलासा दिला.
















