जळगाव (प्रतिनिधी) – दुचाकीजवळ दुसरी दुचाकी लावल्याच्या कारणावरुन तिघांनी राहूल जालंधर चौधरी (वय ४६, रा. प्रतापनगर) यांना लाठीकाठीने तर त्यांच्या वडीलांना लोखंडी पट्टीने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. १ जून रोजी रात्री साडेआठ वाजता प्रतापनगरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील प्रताप नगरात राहुल चौधरी हे वास्तव्यास असून दि. १ जून रोजी अविनाश खैरनार यांच्या दुचाकी शेजारी राहुल चौधरी यांच्या मुलीने त्यांची दुचाकी लावली. त्या कारणावरुन संशयित अभय खैरनार यांनी चौधरी यांच्या पत्नीला माझी मोटारसायकल कोणी काढली, याची विचारणा करुन त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर संशयित अविनाश खैरणार व अजिंक्य खैरनार यांनी राहूल चौधरी यांना मारहाण केली. यावेळी त्यांचे वडील जालंधर चौधरी हे भांडण सोडविण्यासाठी आले असता, त्यांच्यावर लोखंडी पट्टीने वार करीत गंभीर जखमी केले. दरम्यान, त्यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित अविनाश रामदास खैरनार, अभय अविनाश खैरनार व अजिंक्य अविनाश खैरनार (तिघ रा. प्रताप नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















