जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचं राजकारण, ईडी नोटीस, राजकारणाचं बदलेलं रुप, युवकांची क्षमता या विषयांवर संवाद साधला. या सर्वांचा अभ्यास केला तर केंद्र सरकार ईडीचा वापर हा राजकरणासाठी तर करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे. तर, राजकारण बदललं असून या क्षेत्रात आल्यापासून पन्नास टक्के केस पांढरे झाले, असल्याचं रोहित पवार म्हणाले.
‘आतापर्यंत ईडीची नोटीस कोणत्याही भाजप नेत्याला आलेली नाही. ती अन्य पक्षातील लोकांना म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांना आलेली असल्याचे पाहायला मिळाले आहे या सर्वांचा अभ्यास केला तर केंद्र सरकार ईडी चा वापर हा राजकारणासाठी तर करत नाही ना अशी शंका निर्माण होत आहे’, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. आमदार रोहित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. डॉ. भूषण मगर यांच्या विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि युवकांशी संवाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना बोलत होते. यावेळी आपल्या डोक्याचे केस पांढरे झाले आहे, असं गंमतीशीर विधान त्यांनी केलं. राजकारणात आल्यावर आपले पन्नास टक्के केस पांढरे झाले आहे, जनतेचे प्रश्न सोडविता असताना स्वतःच्या विचार न करता जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पहिले प्राधान्य द्यावे लागते, त्याला वेळ द्यावा लागतो हे करत असताना अनेक वेळा स्ट्रेस ला सामोरे जावे लागते, पूर्वी सारखं राजकारण आता सोपं राहील नसल्याने सध्या राजकारणात मोठा ताणतणाव असल्याचे पाहायला मिळत आहे, त्यामुळे केस पांढरे झाले आहे, असं आपण म्हटल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
युवकांच्या मध्ये मोठी ताकद आहे या ताकदीला जर आपण दिशा देऊ शकलो नाही तर ही ताकद वाया जाऊ शकते. तरुणाई चुकीच्या मार्गाने लागली तर मोठ्या प्रमाणावर अडचणी येऊ शकतात. युवकांना ताकद देण्यासाठी आघाडी सरकार सर्व प्रयत्न करत आहे. मात्र, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. युवकांनी आपला वापर कोणी करून घेणार नाही याची काळजी घ्यायला हवी असही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार यांनी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, असं म्हटलेय. शेतकरी गेल्या ६० दिवसांपासून त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक असो की तामिळनाडू असो शेतकरी हा शेतकरी असतो याचा विचार केंद्र सरकारनं करण्याची गरज आहे, असं रोहित पवार म्हणाले. केंद्र सरकारनं ६० दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानानं वागवण्याची गरज आहे. शेतकरी आंदोलन सुरु झाले त्यावेळी त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. त्यांना रोखण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला. रस्ते खोदण्यात आले या चुकीच्या गोष्टी होत्या, अशी टीका रोहित पवार यांनी केली. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना सन्मान देण्याची गरज असल्याचं मत पवारांनी व्यक्त केले.