भुसावळ (प्रतिनिधी) मुलीचे लग्न करण्यासाठी पाच लाखांची खंडणी द्यावी लागेल, असे सांगून येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यास मारहाण केली. तसेच पोलिसात तक्रार केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडका चौफुली भागातील रहिवासी सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी साकीर अली अहमद अली (वय ६४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना दोन मुली आहेत. काही दिवसापुर्वी मकसुद अली उर्फ बाबा पहेलवान हा त्यांच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने साकीर अली यांच्या मुलीला बघितले होते. त्यावेळी साकीर अली यांनी मुलीच्या लग्नाची बोलणी चालु असल्याबाबत सांगितले होते. यानंतर शनिवारी (ता. २०) दुपारी साडेतीनच्या सुमारास साकीर अली यांना मकसूद अलीने फोन करुन, तुमच्या मुलीसाठी चांगले स्थळ पाहिले आहे, तुम्ही सायंकाळी घरी येण्याचे सांगितले. घरी गेल्यानंतर मकसूद याने मेहमुद नामक व्यक्तीच्या मुलासाठी स्थळ आले असल्याचे सांगितले. त्यावेळी मकसूद अली याने एक तोंडाला रुमाल बांधलेला मुलास बोलाविले, काही समजण्याचे आत त्या व्यक्तीने साकीर अली यांना मारहाण सुरु केली. मकसुद अलीने लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर तो मुलगा काहीवेळाने निघुन गेला. त्यानंतर मकसुद अलीने सांगितले की, मुलीचे लग्न करायचे असल्यास १० लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली. यावर साकीर अली यांनी माझ्याकडे इते पैसे नसल्याचे सांगितले असता, मकसूद म्हणाला की, तुझा प्लॅाट विकून पाच लाख रुपये दे, तरच मुलीचे लग्न होऊ देऊ असे म्हणत साकीर अली यांच्या खिशातून ९ हजार रुपये हिसकावून घेतले. तसेच पोलिसात तक्रार केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.