जळगाव (प्रतिनिधी) आपण वायफळ बडबड करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर लक्ष केंद्रित केले आहे. विविध विकास कामातून जनतेला ते दिसून आलेच आहे, असे मत शिवसेना नेते राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ते बोलत होते. यावेळी त्यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ना. गुलाबराव पाटील म्हणाले गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाशी झुंज घेण्यातच आपली उर्जा जास्त प्रमाणात खर्च झाली. मात्र, यंदाची दिवाळी हे आशांचे दीप प्रज्ज्वलन करणारी ठरली आहे. कोरोना काळातील कटू आठवणींना मागे सारत आपण नव्या उमेदीने आयुष्याची सुरवात केली आहे. यंदा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी जेरीस आला असून राज्य सरकारतर्फे बळीराजाला त्याच्या न्याय्य हक्क प्रदान करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विरोधक यात देखील राजकारण करत आहेत.
आम्ही विरोधात असतांना जनतेला वेठीस न धरता, जनतेच्या मागण्यांसाठी मोर्चे काढून न्याय मिळवून देण्याचे काम केले होते. आज सत्तेत असतांना शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण करून हेच काम करत आहोत. वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून यंदा मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने जिल्ह्यात विद्युत पोल, ट्रान्सफार्मर्स, डीपी आदींसाठी तब्बल ४१ कोटी रूपयांची मान्यता २ वर्षात प्रदान करण्यात आलेली आहे. शेत पाणंद रस्त्यांची कामे सर्वात पहिल्यांदा आणि सर्वाधीक प्रमाणात जळगाव जिल्ह्यात झालीत.
जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकर्यांना मदत मिळाली नसल्याचा कांगावा विरोधकांनी केला आहे. मात्र, शेतकर्यांना नुकसान भरपाईच्या माध्यमातून व पीक विम्याच्या माध्यमातून भरीव मदत करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील फक्त ग्रामीण भागालाच नव्हे तर शहरी भागासाठी सुध्दा भरीव तरतूद करण्यात आली आहे. यात जळगाव शहरासाठी पहिल्यांदाच जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून तब्बल ६१ कोटी रूपयांची विकासकामे मंजूर करण्यात जळगाव जिल्ह्याच्या इतिहासात विकासाचे नवीन पर्व सुरू झाले आहे.