
जळगाव (प्रतिनिधी) – ग्राहकांना सर्वोत्तम सेवा व सुरळीत वीजपुरवठा देण्यास प्राधान्य द्या. याबरोबरच महावितरणच्या महसुलाचा स्रोत असलेल्या वीजबिलांच्या वसुलीवर तसेच वीज गळती कमी करण्यावर भर द्या,असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी दिले.
जळगाव येथे विद्युत भवनात झालेल्या जळगाव परिमंडलाचा आढावा घेताना ते बोलत होते. आढावा बैठकीला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी, अधीक्षक अभियंता संजय सरग, प्रभारी अधीक्षक अभियंता चेतन नंदनवार यांच्यासह परिमंडलातील सर्व विभागीय कार्यकारी अभियंते, विभागप्रमुख आणि उपव्यवस्थापक (वित्त व लेखा) यांची उपस्थिती होती.
संचालक औंढेकर म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रात सौर क्रांती होऊ घातली आहे. या प्रकल्पाद्वारे कृषिपंपांना दिवसा वीज पुरवली जात आहे. जळगाव परिमंडलातही अनेक कृषी वीज वाहिन्यांद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवली जात आहे. मात्र शंभर टक्के कृषी फिडरद्वारे दिवसा वीज पुरवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा. फिडर सेपरेशनच्या कामाला गती द्या तसेच मिस्क्ड फिडरवरील ग्राहकांसाठी एसडीटी (स्पेशल डिझाइन्ड ट्रान्सफॉर्मर) बसविण्याच्या सूचना त्यांनी केली.
ग्राहकांना अचूक आणि वापराएवढे बिल गेले पाहिजे याची खबरदारी घ्या. रीडिंग होत नसलेले किंवा फॉल्टी असलेले मीटर तातडीने बदलवून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावा. वीजग्राहकांना स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत व फायद्याबाबत माहिती देऊन त्यांचा गैरसमज दूर करा,असे निर्देश त्यांनी दिले. संचालक औंढेकर म्हणाले की, परिमंडलाची वाणिज्यिक आणि वितरण हानी कमी करण्यासाठी ग्राहकांना दिलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची वसुली झालीच पाहिजे. वीजबिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करा. त्यानंतरही थकबाकीदार ग्राहक बिल न भरता अनधिकृतपणे वीज वापरताना गुन्हे दाखल करा. वीजचोरीवर आळा घालण्यासाठी धडक मोहीम राबवा. स्मार्ट मीटर बसवलेल्या मात्र थकबाकीसाठी ऑटो डिस्कनेक्टेड होऊनही वीजबिल न भरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची तपासणी करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. या कामात कसलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही संचालक औंढेकर यांनी यावेळी दिला.
















