जालना (वृत्तसंस्था) शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांसह चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सामनगाव (ता. जालना) येथे मंगळवारी (ता. ६) घडली. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ, पिता-पुत्राचा समावेश आहे. ओमकार कृष्णा पडूळ (६ वर्ष), भागवत कृष्णा पडूळ (९ वर्ष), युवराज भागवत इंगळे (५ वर्ष), भागवत जगन्नाथ इंगळे (वय ३२ वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.
भागवत जगन्नाथ हा शेततळ्यात मालकाची दोन मुले आणि त्याचा एक मुलगा घेऊन पोहण्यासाठी गेला होता. मात्र मुले पाण्यात बुडू लागली. त्यांना वाचवण्यासाठी गेला असता त्याचाही बुडून मृत्यू झाला. घटना अशी की, ओंकार कृष्णा पडूळ (वय ७) ), भागवत कृष्णा पडूळ (९), युवराज भागवत इंगळे (७) हे दुपारी खेळत असताना सामनगावातील शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले. अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले. आरडाओरड सुरू होताच शेततळ्याशेजारी असलेले भागवत जगन्नाथ इंगळे ( ३६) हे तिघांना वाचविण्यासाठी शेततळ्यात उतरले. मात्र तीन मुलांसह त्याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेले ओंकार व भागवत पडूळ हे सख्खे भाऊ तर भागवत जगन्नाथ इंगळे व युवराज भागवत इंगळे हे पिता-पुत्र आहेत. शेततळ्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची बातमी गावात माहिती पडताच गावकऱ्यांनी शेततळ्याकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशनमन दलाला याची माहिती दिली. मृतदेह सापडत नसल्याने शेततळे एका बाजूने फोडण्यात आले होते. गावातील युवकांनी शेततळ्यातून त्या चौघांचे मृतदेह बाहेर काढले.