मुंबई (वृत्तसंस्था) इंधन दरवाढ करायला सुरुवात केली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढते ते आपल्या भल्यासाठी आहे. चांगल्या हेतूने इंधन दरवाढ होत आहे. ते आपण लक्षातच घेत नाही, असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. आज ते एमएमआरडीएच्या कार्यक्रमात बोलत होते.
सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचा टक्का घसरतोय हे केंद्राच्याही लक्षात आलं आहे. म्हणूनच त्यांनी इंधनाचे दर वाढवायला सुरुवात केली आहे. आपण टीका करतो की पेट्रोल एवढं वाढलं, डिझेलचे भाव तेवढे झाले. तसं नाहीये. हे आपल्या भल्यासाठीच होतंय, असा चिमटा काढतानाच मी काही बोललो तर टीकात्मक किंवा उपहासात्मक बोलतो असं म्हणता. पण मी खरं की खोटं बोलतो हे तुम्ही सांगा. इंधन परवडेनासं झालं तर तुम्ही म्हणतात तसं प्रवासी तुमच्या बाजूने येतील की नाही? म्हणून चांगल्या हेतूने सरकार इंधन दरवाढ होत आहे. पण आपण लक्षातच घेत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
थोड्यावेळापूर्वी एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन यांच्याशी बोलणं झालं. त्यांना मी म्हटलं, वाहतूक व्यवस्थेचा तुम्ही अभ्यास केला ना. त्यावर ते म्हणाले, हो केला. खरं तर अभ्यास करण्याचं काम आमचं असतं तर आम्ही राजकारणात आलोच नसतो. मार्क देण्याचं काम आमच्याकडे आलं आहे. साहजिकच आहे शासन, प्रशासन आपल्या सर्वांची जबाबदारी एक असते. अशावेळी राजकारण एका बाजूला ठेवायचे असते. जनतेला सोयी सुविधा देणं हे आपलं कर्तव्य आहे. ते पार पाडताना त्यात राजकारण येऊ नये. येऊ देणारही नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. वाहतूक व्यवस्था ही जशा आपल्या शरीरात रक्तवाहिन्या असतात तशा या शहराच्या वाहिन्या आहेत. एमएमआर रिजनची लोकसंख्या ऑस्ट्रेलिया एवढी आहे. ऑस्ट्रेलिया एवढा महाकाय देश. त्याच्याएवढी लोकसंख्या आपल्या एवढ्याश्या भागात सामावलेली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
मुंबईत त्यावेळी ट्राम्स होत्या. पुण्यात घोडागाड्या होत्या. त्यातून फिरणं ही गंमत असायची. मी लोकल आणि बेस्ट बसेसमधूनही प्रवास केला आहे. बाहेरच्या देशात ज्या सुविधा आहेत त्या आपण आता आणत आहोत. पण आपल्याकडे अॅटोमॅटिक लोकल सेवा आधीच होती. ती जगात कुणाकडेही नाही. अॅटोमॅटिक लोकल सेवा म्हणजे प्रवासी स्टेशनला उभा राहिला तर तो लोकलमध्ये आपोआप ढकलला जातो आणि बाहेरही आपोआप फेकला जातो. ही सेवा जगात कुठेच नाही. आपली सेवा ऑटो रेल झाली आहे. हा बाहेरच्या लोकांसाठी अभ्यासाचा विषय आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच एकच हशा पिकला.