नांदेड (वृत्तसंस्था) किनवट तालुक्यातील मौजे अंबड येथील दोन विद्यार्थीनी जनावराला चारा आणण्यासाठी गेल्या असता त्यांचा शेततळयात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि.६ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. दहावीत शिकणारी वैष्णवी प्रदीप कुमरे व चौथीत शिकणारी परिधी प्रदीप कुमरे अशी त्यांची नावे आहेत.
गुरांना चारा आणण्यासाठी गेल्या होत्या !
सोमवार दि. ६ नोव्हेंबर रोजी अंबाडी येथील दहावीत शिकणारी वैष्णवी प्रदीप कुमरे व चौथीत शिकणारी परिधी प्रदीप कुमरे या दोघं बहिणी आपल्या शेतात गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. बऱ्याच वेळ झाल्यावरही त्या घरी परत न आल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांचा शोध सुरु केला असता शेताशेजारी असलेल्या तळयाबाहेर त्या दोघी बहिणींच्या चपला दिसून आल्या, त्यामुळे तळ्यात शोध घेतला असता दोघींचेही मृतदेह हाती लागले. हा प्रकार घडल्याचे वृत्त कळल्यानंतर गावकऱ्यांनी तळयाजवळ धाव घेऊन त्यांना तळयाबाहेर काढून रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
काच तिरडीवर अंत्ययात्रा, एकाच सरणावर अग्नी देऊन अंत्यसंस्कार !
७ नोव्हेंबर रोजी त्या दोघींची एकाच तिरडीवर अंत्ययात्रा काढून एकाच सरणावर अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने उमरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोघं बहिणींचा मृतदेह बघताच कुटुंबीयांनी काळीज चिरणारा आक्रोश केला होता. दरम्यान, याबाबत मुलींचे वडिल प्रदीप कुमरे यांनी दिलेल्या माहितीवरुन किनवट पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सपोनि वाठोरे हे करीत आहेत.