
जळगाव (प्रतिनिधी) – “शासन दिव्यांग बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मात्र केवळ शासनानेच नव्हे, तर समाजातील सेवाभावी संस्था, उद्योग आणि दानशूर व्यक्तींनीही पुढे येऊन दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावला पाहिजे. दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असून त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि आयुष्यात निर्माण होणारा आत्मविश्वास हेच सर्वात मोठे समाधान आहे,” असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, “प्रत्येक दिव्यांग विद्यार्थी हा समाजाची अमूल्य संपत्ती आहे. योग्य संधी, आधुनिक साधने आणि दर्जेदार शिक्षण मिळाल्यास ते प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणारे अनेक प्रेरणादायी उदाहरणे समाजात आहेत. त्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांकडे दयेच्या भावनेने नव्हे, तर समानतेच्या, सन्मानाच्या आणि विश्वासाच्या भावनेने पाहण्याची गरज आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन, प्रशासन, शिक्षक, पालक आणि समाज या सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जळगाव पंचायत समितीच्या सभागृहात समग्र शिक्षा अभियानाच्या समावेशित शिक्षण विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील ३८ दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार व्हीलचेअर, सी.पी. व्हीलचेअर, डिजिटल श्रवणयंत्रे, टीएलएम किट, रोलॅटर, वॉकिंग स्टिक तसेच इतर सहाय्यभूत साहित्यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय १५ मतिमंद विद्यार्थ्यांना विशेष एमआर किटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी अजित तडवी यांनी केले. यावेळी त्यांनी समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, त्यांची उद्दिष्टे तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक सुशील पवार यांनी केले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, गटशिक्षणाधिकारी अजित तडवी, माजी सभापती पती जनाआप्पा कोळी, दूध संघाचे रमेशआप्पा पाटील, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र चिंचोले, अल्लाउद्दीन बेलदार, विजय पवार यांच्यासह समग्र शिक्षा अभियान व शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी, विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी लाभार्थी, त्यांचे पालक तसेच मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















