
भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरात एका तरुणाला हात-पाय बांधून अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपींवर अद्याप कठोर कारवाई झालेली नसल्याचा आरोप पीडित तरुणाच्या आईने केला आहे. आरोपींवर कठोर कारवाई करून मुलाला न्याय मिळावा, या मागणीसाठी त्यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.
निवेदनात सौरभ सोनवणे, सिद्धेश महाडिक, वासिफ शेख आणि सागर साळुंखे यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना एप्रिल महिन्यात घडल्याचे निवेदनात नमूद आहे. संबंधित तरुणाला हात-पाय बांधून मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्याशी अपमानास्पद वर्तन करून त्याला माफी मागण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचाही पीडिताच्या आईचा आरोप आहे. या प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पीडिताच्या आईने या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे ई-मेलद्वारे तक्रार केल्याचे सांगितले आहे. तसेच राज्य मानवाधिकार आयोग आणि जिल्हा व सत्र न्यायालयाकडेही तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे. आता या प्रकरणाच्या तपासात पोलिसांकडून काय कारवाई केली जाते आणि पीडित कुटुंबाच्या निवेदनावर जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
















