
धरणगाव / मुंबई, प्रतिनिधी : स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत राज्यातील वापरलेल्या पाण्याच्या व्यवस्थापन प्रकल्पांच्या प्रभावी, गुणवत्तापूर्ण आणि कालबद्ध अंमलबजावणीसाठी नगर विकास विभागाने दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, मलजल प्रक्रिया केंद्रे (STP), मलजल वाहिनी जाळे (Sewer Network) आणि नाला अडवणे व वळवणे (Interception & Diversion) यांसारख्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी विभागनिहाय नामांकित संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR), तांत्रिक मान्यता, गुणवत्ता नियंत्रण, संचालन व देखभाल याबाबत स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वापरलेल्या पाण्याच्या व्यवस्थापन प्रकल्पांना मोठी चालना मिळणार असून त्यामध्ये धरणगाव नगरपरिषदेच्या प्रस्तावित मलनिस्सारण प्रकल्पालाही महत्त्वपूर्ण गती प्राप्त झाली असून धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल मिळाला आहे.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी धरणगाव शहरातील वापरलेल्या पाण्याच्या शास्त्रोक्त व्यवस्थापनाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे धरणगाव नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत सादर केलेल्या मलनिस्सारण योजनेच्या सविस्तर प्रकल्प अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रादेशिक विभाग, नाशिक यांनी तांत्रिक मान्यता प्रदान केली आहे. या प्रकल्पामध्ये ६ MLD क्षमतेचे आधुनिक MMBR तंत्रज्ञानाधारित मलजल प्रक्रिया केंद्र (STP) तसेच Interception & Diversion घटकांचा समावेश असून प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत सुमारे ₹१२.४९ कोटी इतकी आहे.
स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत वापरलेल्या पाण्याचे वैज्ञानिक व्यवस्थापन, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर, नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण आणि शाश्वत नागरी विकास ही प्रमुख उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार प्रक्रिया न केलेले सांडपाणी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये सोडले जाणार नाही याची खात्री करण्यासाठी STP उभारणे, मलजल वाहिनी जाळे निर्माण करणे, नाले अडवून वळविणे आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे यावर विशेष भर देण्यात आला असून या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित संस्थांकडून बेसलाईन सर्वेक्षण, टोपोग्राफिकल सर्व्हे, मृदा चाचणी, हायड्रॉलिक डिझाईन, BOQ, STP तंत्रज्ञान आराखडा, मलजल वाहिनी जाळ्याचे नकाशे, Interception & Diversion डिझाईन, विद्युत व यांत्रिक नियोजन, संचालन व देखभाल आराखडा तसेच प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्वापराची योजना तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
धरणगाव प्रकल्पाची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर शहरातील उघड्या नाल्यांमधून वाहणारे दूषित पाणी, दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि जलप्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर उद्याने, वृक्षसंवर्धन, रस्ते धुणे, बांधकामे तसेच इतर सार्वजनिक उपयोगांसाठी करता येणार असल्याने जलस्रोतांवरील ताणही कमी होणार आहे. तांत्रिक मान्यतेतील अटींनुसार प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या प्रक्रिया केलेल्या पाण्याची गुणवत्ता निर्धारित निकषांनुसार राखणे आणि त्याचा पुनर्वापर वाढविण्यासाठी नगरपरिषदेला आवश्यक व्यवस्था करावी लागणार आहे.
धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल – पालकमंत्री गुलाबराव पाटील
“स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन यांचा परस्परांशी अतिशय जवळचा संबंध आहे. राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत वापरलेल्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी तयार केलेली नवी कार्यपद्धती ही राज्यातील शहरांच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वाची ठरणार आहे. धरणगावसह राज्यातील सर्व नागरी भागांमध्ये आधुनिक मलजल प्रक्रिया सुविधा उभारून सांडपाण्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, जलस्रोतांचे संरक्षण आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर वाढविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. धरणगाव शहराच्या या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला असून शासनाच्या ३ ऑगस्ट २०२६ च्या परिपत्रकामुळे राज्यभरातील वापरलेल्या पाण्याच्या व्यवस्थापन प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी स्पष्ट धोरणात्मक चौकट उपलब्ध झाली असून, धरणगावच्या तांत्रिक मान्यता प्राप्त प्रकल्पाला त्याचा थेट लाभ मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराच्या स्वच्छता व पर्यावरण व्यवस्थापनात गुणात्मक बदल घडून येईल. स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यावरणपूरक महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल,” असे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
















