जळगाव (प्रतिनिधी) पक्षातर्फे ज्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला होता,ते जर नकार देत असतील तर आपण रावेर लोकसभा मतदार संघातून लढण्यास तयार आहोत, असे सांगून माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. डॉ. पाटील यांनी या मतदार संघात उमेदवारी केल्यास ही लढत ‘हाय व्होल्टेज’ होण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्हयातील रावेर आणि जळगाव या दोघंही मतदार संघात भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपानुसार जळगाव मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. ‘मविआ’ कडून दोघंही मतदार संघात अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. रावेर मतदार संघात एकनाथराव खडसे हे निवडणूक लढवतील, असे अपेक्षित धरून राष्ट्रवादीने हा मतदार संघ आपल्याकडे घेतला होता. परंतू प्रकृतीचे कारण देत खडसे यांनी निवडणूक लढण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यावर आता माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी कुणी तयार नसेल आपण या मतदार संघातून लढण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
डॉ. पाटील यांनी म्हटले आहे की, मतदार संघ शरद पवार साहेबांनी मोठ्या विश्वासाने आपल्या पक्षाकडे घेतला आहे. त्यामुळे पक्ष जोरदारपणे हा मतदार संघ लढविणार आहे. त्यांनी विश्वासाने उमेदवारी देऊनही एकनाथ खडसे तब्बेतीच्या कारणामुळे नकार देत असतील तर या मतदारसंघातून आपण उमेदवारी लढण्यास तयार आहोत. केवळ कोणी उमेदवारी घेत नाही म्हणून आपण लढतोय असे नव्हे तर आपली निवडून येण्याची धमकही आहे, असल्याचेही उघड चॅलेंज दिले आहे. थोडक्यात डॉ. पाटील यांच्या नवीन राजकीय भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून पवार गटाने त्यांना उमेदवारी देण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे डॉ. पाटील उमेदवार झाल्यास रक्षा खडसे यांच्या विरुद्धची त्यांची लढत ‘हाय व्होल्टेज’ होईल, असे बोलले जात आहे.