जळगाव (प्रतिनिधी) येथील अनुभूती निवासी स्कूलच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत बेस्ट ऑफ फाईव्ह पद्धती प्रमाणे कु. राशी चांबोळेही विद्यार्थिनी ९५.४० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली तर हर्षिल बोथरा (९५.२०) टक्के मिळवून व्दितीय आला. अनुभूती स्कूलची ही अकरावी बॅच होती.
दहावीसाठी एकूण ४६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. हर्षिल बोथरा आणि अनुज अग्रवाल या दोन्ही विद्यार्थ्यांनी गणित या विषय़ात १०० पैकी १०० गुण प्राप्त करत विशेष प्राविण्य मिळविले. विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली याचा आनंद असल्याचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन म्हणाले.
जैन इरिगेशनचे संस्थापक ज्येष्ठ विचारवंत भवरलालज जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अनुभवावर आधारीत निवासी शाळेने आपले वेगळे असे वैशिष्ट्य टिकवून ठेवले आहे. फक्त अभ्यासच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि सरसतेचा ध्यास इथे घेतला जातो. विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचा पाईक व्हावे, चांगला नागरीक व्हावे यादृष्टीने अनुभूती शाळेच्या व्यवस्थापनाचा कटाक्ष असतो. कोरोनामुळे यंदा परीक्षा झाल्या नाही परंतु अंतर्गत गुणांच्या आधारे आणि बोर्डाने ठरविलेल्या पद्धतीप्रमाणे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. मिळालेले हे यश अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ सल्लागार जे. पी. राव तसेच प्राचार्य मनोज परमार व शिक्षकांच्या मेहनतीचे हे फळ आहे. दहावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी हिंदी, गणित आणि शास्त्र या विषयात सर्वोत्तम गुण प्राप्त केले आहेत, अशी प्रतिक्रिया अनुभूतीच्या संचालिका निशा अनिल जैन यांनी दिली.