नागपूर (वृत्तसंस्था) शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना इशारा दिला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना तुरूंगात डांबण्याचे षडयंत्र भाजपने रचले आहे. मात्र, तुमच्याकडे ईडी असेल तर आमच्याकडे सीआयडी, असं राऊत म्हणाले.
शिवसंपर्क अभियानासाठी ते नागपूरला आले आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांना कार्यकर्त्यांसारखे वागवत असल्याचा आरोप केला. माजी मंत्री अनिल देशमुख, नबाव मलिक यांना ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना कोठडीत डांबण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यासाठी खोटे आरोप केले जात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेच्या नावावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष धमक्या दिल्या जात आहेत. मात्र महाराष्ट्रात महाविकस आघाडीचे सरकार आहे हे भाजपच्या नेत्यांनी ध्यानात ठेवावे. त्यामुळे जेलमध्ये कोण जाणार हे भविष्यात दिसूनच येईल. भाजपच्या नेत्यांच्या घोटाळ्याच्या फाईल उघडल्या जात आहेत. अनेकांच्या चौकशा सुरू झाल्या आहेत. मी कोणाचे नावे घेणार नाही. मात्र कोण जेलमध्ये जाणार याची काळजी भाजपने करावी असे संजय राऊत यांनी सांगितले.
सरसंघचालकांना जनाब म्हणायचे का?
एमआयएमच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. असे असताना त्यांना जनाब संबोधून भाजपचे नेते संभ्रम निर्माण करीत आहेत. असेच असेल तर सरसंघचालक मोहन भागवत यांनाही जनाब म्हणायला हरकत नाही. सरसंघचालकांच्या वक्यव्यानुसार भारतातील हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे. काश्मीरमध्ये भाजपने मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याशी युती करून सरकार स्थापन केले होते. भाजपचा अल्पसंख्याक सेलसुद्धा आहे. संघाचा मुस्लिम मंच आहे. भाजपच्या मंत्रिमंडळात सिकंदर बख्त मंत्री होते. केरळचे राज्यपाल मुस्लिम आहेत. मग सरसंघचालक आणि भाजपच्या नेत्यांनाही जनाब म्हणणे चुकीचे ठरणार नाही असे संजय राऊत म्हणाले.