ग्वालियर (वृत्तसंस्था) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणावर केलेल्या भाष्यानंतर या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जाईल याची खात्री वाटत होती. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडीत स्फोटकं सापडल्यानंतर या प्रकरणाची चौकशी केंद्राकडून एनआयएकडे सोपवण्यात आली आहे. म्हणजेच, हा तपास भाजप करत आहे, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलंय.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घरासमोर स्फोटकांसहीत आढळलेल्या गाडीनंतर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या हालचालींना वेग आलेला दिसून येतोय. याच प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ‘एनआयए’च्या हाती तपास सोपवणं याचाच अर्थ भाजपकडून चौकशी करून घेणं, असं परखड मत दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केलंय.
‘एनआयए’ संचालक वाय सी मोदी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत, असा आरोपही दिग्विजय सिंह यांनी केला आहे. यापूर्वी वाय सी मोदी हे गुजरात दंगल प्रकरणी तसंच गुजरातचे मंत्री हरेन पंड्या हत्या प्रकरणाची निगडीत होते आणि प्रत्येक प्रकरणात आरोपींना क्लीनचिट देण्यात आली, अशी आठवणही दिग्विजय सिंह यांनी यावेळी करून दिली. बॉम्बस्फोटाशी संबंधित आरएसएस कार्यकर्त्यांविरोधात अनेक पुरावे होते. परंतु, या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आली आणि त्यांना क्लीनचीट मिळाली, असं सिंह यांनी म्हटलंय.