नाशिक (वृत्तसंस्था) पंतप्रधान मोदींविरोधात विरोधकांकडे चेहरा नसल्याच्या प्रश्नावर अखेर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खास शैलीत थेट उत्तर दिलंय. यामुळे या चर्चाना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. विरोधकांकडे चेहरा नाही असं म्हणता येणार नाही, असं शरद पवार यांनी आज स्पष्ट केलं. शरद पवार हे आज निफाडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं.
इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेव्हा त्यांच्याविरोधातही नेतृत्व नव्हतं. मात्र, सगळ्या शक्ती मोरारजी देसाई यांच्या मागे उभ्या राहिल्या आणि नेतृत्व उभं राहिलं. त्यामुळे विरोधी पक्षाकडे चेहरा नाही असं म्हणता येणार नाही, असं पवार म्हणाले. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात त्रिपुरा घटनेचे हिंसक पडसाद उमटले. त्यावरही पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्रिपुरा घडलं म्हणून महाराष्ट्रात असं घडण योग्य नाही. महाराष्ट्रात काही संघटना अशा घटना करतात हे योग्य नाही. राज्यातील काही मोजक्या भागात या घटना घडल्या आहेत. या प्रवृत्तींना किती महत्व द्यायचं हे लोकांनी ठरवावं. राज्य सरकार चांगलं काम करत असताना बंदचा निर्णय नैराश्यातून घेण्यात आला. सार्वजनिक शांततेला धक्का बसेल असं काम एकेकाळी सत्तेत असलेले लोक हे करताय हे दुर्दैव आहे. तीन चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे जाणीवपूर्वक केलं जात आहे.- याचा फटका सामान्यानांच बसतो, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी मंत्र्यांच्या चौकश्यांवरही भाओष्य केलं. विरोधकांच्या दृष्टीने ही भावना झाली की असं होणार. अधिकाऱ्यांचा यासाठी वापर केला जातो. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यात सहभाग आहे, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी नक्षलवादावरही भाष्य केलं. नक्षलवादाचा ट्रेंड महाराष्ट्रात वाढत आहे असं नाही. ज्यांनी खरोखरच नक्षलवादी विचार स्वीकारले ते वेगळे आहेत. असा वर्ग फक्त महाराष्ट्रात आहे असं नाही. आदिवासींवर अन्याय झाला आणि त्यांनी आंदोलन केलं की त्यांना नक्षलवादी ठरवता. यावर बॅलन्स ठेवायला हवा. माझ्या दृष्टीने हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही. सोशित लोकांना मुख्य प्रवाहात आणून बदल घडेल. पोलीस बळाचा वापर करून हा प्रश्न सुटेल असं म्हणणं असत्य आहे. तिकडे विकास करायला हवा. तिथल्या लोकांना संधी द्यायला हवी, असंही त्यांनी सांगितलं.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालं. त्यावरही त्यांनी शोक व्यक्त केला. पुरंदरे यांनी महाराष्ट्राच्या नव्या पिढीला इतिहास समजावा यासाठी काळजी घेतली. असे योगदान देणारे पुरंदरे आपल्यात नाहीत. त्यांनी शिवछत्रपतींच्या इतिहास ठेवला. तो वादग्रस्त ठरला. मात्र त्यावर बोलण्या इतका मी इतिहास अभ्यासक नाही. संपूर्ण आयुष्य ज्यांनी या कामात घातलं त्यांच्या बद्दल अशा बदनाम्या केल्या जातात. ते यांच्या बाबतही घडलं असावं, असंही ते म्हणाले.