मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या के.पी.गोसावीनं आता समोर येत संपूर्ण प्रकरणात काही खुलासे केले आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननेच मला त्याच्या आई-वडीलांना फोन लावायला सांगितला” असा दावा के.पी.गोसावी याने केला आहे.
“आर्यन खाननेच मला त्याच्या मॅनेजरला फोन लावायला सांगितला. कारण त्याच्याकडे स्वतःचा फोन नव्हता. माझ्याकडे फोन होता. त्याने मला त्याच्या आई-वडिलांना आणि मॅनेजरला फोन लावून देण्याची विनंती केली” असे गोसावीने सांगितले. “६ ऑक्टोबरपर्यंत मी मुंबईतच होतो. मला अनेक धमकीचे फोन आले. त्यामुळे मला माझा फोन बंद करावा लागला. एनसीबीचे झोनल संचालक समीर वानखेडे यांच्याबद्दल मला आधी माहित नव्हतं. त्यांना मी टीव्हीवरच बघितलं” असं गोसावीने सांगितलं.
“मी याआधीच्या एनसीबीच्या कुठल्याही कारवाईचा भाग नव्हतो” असे गोसावी म्हणाला. “मी मजकूर वाचल्यानंतरच स्वाक्षरी केली” असे गोसावीने सांगितले. या प्रकरणातील आणखी एक पंच प्रभाकर साईल यांनी उलटा आरोप केला आहे. एनसीबीने आपल्याला कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करायला लावली, असे सांगितले. त्यानंतर गोसावीने हा खुलासा केला आहे.