जळगाव (प्रतिनिधी) तीस लाख रुपयांसाठी सेवानिवृत्त परिचारीका स्नेहलता चुंबळे (६०, रा. खोटेनगर, ह. मु. नाशिक) यांचा खून हा दोन दिवसांपुर्वी केलेला पूर्वनियोजीत कट होता. संशयितांनी खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापर्यंतची संपूर्ण तयारी केली होती. त्यांनी परिचारिकेचा मृतदेह तापी नदीपात्रात फेकल्याचे पोलिसांना सांगितले खरे, मात्र त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट दुसऱ्या पद्धतीने तर लावली नाही ना? याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. जो पर्यंत महिलेचा मृतदेह मिळून येत नाही तो पर्यंत हे गुढ कायम राहणार आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सेवानिवृत्त परिचारीका ग. स. सोसाटीच्या सभेला आल्यानंतर दि. २० रोजीत्या बेपत्ता झाल्या होत्या. दि. २२ ऑगस्ट रोजी तालुका पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. ३० लाख रुपये एवढ्या मोठ्या रकमेसह महिला बेपत्ता असल्याने तालुका पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद होऊन आठवडा उलटला तरी तपास लागत नव्हता. त्यामुळे चिंतत असलेले चुंबळे यांच्या मुलाने पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेत सर्व हकीकत सांगितली. त्या वेळी डॉ. रेड्डी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना तपासाविषयी सूचना दिल्या.
ग. स.च्या सभेसाठी येण्यापुर्वीच स्नेहलता चुंबळे या खुनातील मुख्य सूत्रधार जि.प. आरोग्य विभागातील कनिष्ट लिपिक जिजाबराव अभिमन्यू पाटील याच्या संपर्कात होत्या. त्या फ्लॅट घेण्यासाठी बँकेतून पैसे काढणार असल्याचे त्याला माहित असल्याने त्याने आपला साथीदार जि.प. बांधकाम विभागातील लिपिक विजय रंगराव निकम याच्यासोबत दि. १८ रोजी दोन दिवसांपुर्वी कट रचून तयार केली होती. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी प्लास्टीकची गोणी आणि दोरी देखील खरेदी करुन कारमध्ये ठेवलेल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
बँकेतून पैसे काढल्यानंतर जिजाबराव पाटील याने मोबाईल बंद करुन ठेवला. पथकाला मिळालेल्या फुटेजमध्ये कार चालकाच्या बोटात अंगठ्या आणि हातात लाल रंगाचा दोरा असल्याचे कैद झाले होते. पथकाला तोच तपासाचा धागा गवसला आणि त्यांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर वाहन चालवित असलेल्या विजय निकम याच्या हातात तोच दोरा आणि अंगठ्या असल्याचे दिसताच ते दोघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
महामार्गावरून जाताना टोल नाकेही चुकविले !
निवृत्त परिचारिकेसोबत आपण आहे, हे समजू नये म्हणून दोघांनी महामार्गावरून जाताना टोल नाकेही चुकविले व अमळनेर तालुक्यातील आर्वी मार्ग ते शिरपूरच्या दिशेने गेले. हा खून पाटील याच्या महागड्या गाडीत करण्यात आल्याने ती गाडी जप्त होऊ नये म्हणून पाटील याने दुसरे जुने वाहन दाखविण्याचाही प्रयत्न केला. मात्र तो पोलिसी खाक्यापुढे फसला.
अटकपूर्व जामिनासाठी काढले होते पैसे
खून केल्यानंतर आपल्याला अटक होऊ शकते, अशी कुणकूण लागताच दोन्ही संशयितांनी अटकपूर्व जामीनसाठी प्रत्येकी एक लाख ३० हजार रुपये वकिलांसाठी काढून ठेवले होते. दोघांनी नेहलता चुंबळे यांना बँकेतून पैसे काढण्याविषयी घरी सांगू नका, असा आग्रहदेखील दोघांनी निवृत्त परिचारिकेला केला होता. जो पर्यंत मयत स्नेहलता चुंबळे यांचा मृतदेह सापडणार नाही तो पर्यंत या घटनेचे गुढ कायम राहील. पोलिसांकडून नदीपात्रात मृतदेहाचा शोध घेतला जात असून एक पथक त्यासाठी ठाण मांडून आहेत.
पथकाने पुरावे दाखविताच दोघांची बोबडी वळली
एलसीबीचे सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोहेकों जितेंद्र पाटील, सुधाकर आंभोरे, अक्रम शेख, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, पोलिस नाईक राहुल पाटील, भारत पाटील यांनी बँकेसह महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवित तांत्रिक विश्लेषणावरुन जिजाबराव पाटील व विजय निकम या दोघांची नावे निष्पन्न केली. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. मात्र त्यांना खाक्यांसह पुरावे दाखविताच दोघांची बोबडी वळली अन् त्यांनी खुनाची कबुली दिली.