
भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर उपचारादरम्यान जखमी रमेश अमोल इंगळे (32, रा.कंडारी) या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या ‘तीन’वर गेली होती. रविवारी रमेशवर शोकाकुल वातावरणात बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, हत्याकांडानंतर संतप्त जमावाने संशयित आरोपी दीपक तायडे याचे घर पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने यात यश आले नाही. दुसरीकडे अटकेतील तिघांना न्यायालयाने 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमकं काय घडलं ?
भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) या वीटभट्टी कामगार भावंडांची जुन्या वादातून दहा संशयितांनी चाकू, तलवार व लोखंडी रॉड डोक्यात मारून निर्घृण हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास कंडारी गावातील महादेव टेकडी परीसरातील पूजा पान सेंटरजवळील वखारीजवळील चौकात घडली होती. या घटनेत या रमेश अमोल इंगळे (32, सर्व रा.कंडारी) हे व विकी साळुंखे (30) हे जखमी झाल्यानंतर अत्यवस्थ रमेश इंगळे यांचा उपचार सुरू असताना गोदावरी रुग्णालयात रविवारी पहाटे दोन वाजता मृत्यू झाला. रविवारी सकाळी मृतदेहावर ट्रामा सेंटरमध्ये डॉ.मयूर चौधरी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अटकेतील तिघांना चार दिवसांची कोठडी !
कंडारीतील खून प्रकरणी दीपक छगन तायडे व मनोज श्रावण मोरे व किरण सपकाळे (तिन्ही रा.कंडारी, ता.भुसावळ)) या तीन संशयितांना अटक करण्यात आली असून रविवारी त्यांना भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची अर्थात 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या हत्याकांडप्रकरणी देवा भील या संशयिताला रविवारी तापी नदीपात्राजवळून अटक करण्यात आली आहे.
हत्याकांडातील आरोपीचे घर पेटवण्याचा प्रयत्न !
कंडारी हत्याकांडातील आरोपी दीपक तायडे याचे घर जाळण्याचा प्रयत्न अज्ञातांनी शनिवारी सायंकाळी केला मात्र पेट्रोलची फेकलेली बाटली वेळीच पोलिसांनी ताब्यात घेतली. तर बाटली फेकणारे संशयीत मात्र कारमधून पसार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

















