जळगाव, (प्रतिनिधी) – जैन हिल्स येथील जैन हायटेक ॲग्री इन्स्टिट्यूटला शिंदे शिवसेना गटाचे खा. श्रीकांत शिंदे, खा. मिलिंद देवरा, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी , युवासेना विभागीय सचिव आविष्कार भुसे, नगरसेवक निखिल चौधरी यांनी आज भेट दिली. यात जैन हिल्स येथील कृषी संशोधन, टिश्युकल्चर रोपनिर्मिती, संरक्षित शेती आणि फ्युचर फार्मिंग आदि तंत्रज्ञानाशी संबंधित उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली. या सर्वांचे स्वागत कंपनीच्या वतीने सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी केले. जैन स्वीट ऑरेंज नर्सरी, वातानुकुलीत काळी मिरी लागवड, मोसंबी नर्सरी, मदर नर्सरी तसेच फ्युचर फार्मिंग या संकल्पनेवर आधारित विविध प्रकल्पांची पाहणी केली आणि माहिती घेतली. जैन हिल्समधील ‘परिश्रम’मध्ये कंपनीच्या कार्याबाबत कंपनीचे सहकारी गिरीश कुळकर्णी व कृषीतज्ज्ञ डॉ. बी.के. यांनी माहिती दिली.
बंदिस्त पद्धतीतील केळी उत्पादन प्रकल्पाला भेटीदरम्यान अतुल जैन यांनी या तंत्रज्ञानाचे फायदे सविस्तरपणे स्पष्ट केले. नियंत्रित वातावरणामुळे पिकांची वाढ अधिक चांगली होते, रोग व कीड प्रादुर्भाव कमी होतो, पाण्याचा कार्यक्षम वापर करता येतो, हवामानातील प्रतिकूल बदलांचा परिणाम कमी होतो तसेच उच्च दर्जाचे आणि अधिक उत्पादन मिळविणे शक्य होते, अशी माहिती त्यांनी दिली. शाश्वत शेतीसाठी संरक्षित शेती तंत्रज्ञानाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. यावेळी मान्यवरांनी जैन इरिगेशनच्या टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाद्वारे विकसित करण्यात येणाऱ्या गुणवत्तापूर्ण रोपनिर्मिती प्रक्रियेची माहिती घेतली. जैन स्वीट ऑरेंज आणि फळबाग विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आधुनिक रोपवाटिका, संशोधनाधारित लागवड पद्धती आणि शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या विविध तंत्रज्ञानाबाबत त्यांना सविस्तर सांगण्यात आले. ‘फ्युचर फार्मिंग’ विभागामध्ये हवामान बदल, जलसंकट आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर विकसित करण्यात आलेल्या आधुनिक कृषी उपाययोजनांची माहिती सादर करण्यात आली. कमी संसाधनांमध्ये अधिक उत्पादन, पाण्याचा कार्यक्षम वापर, अचूक पोषण व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाधारित शेती व्यवस्थापन यांसारख्या उपाययोजनांमुळे कृषी क्षेत्रात मोठे परिवर्तन घडून येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भेटीच्या समारोपप्रसंगी मान्यवरांनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या कृषी संशोधन, नवोपक्रम आणि शेतकरी-केंद्रित उपक्रमांचे कौतुक केले. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि शाश्वत शेतीच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देण्याचे कंपनीचे कार्य देशातील कृषी क्षेत्रासाठी दिशादर्शक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
















