पुणे (वृत्तसंस्था) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज्य सरकारने किरीट सोमय्यांविरोधात केलेल्या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला आहे. नजरकैदेत ठेवायला किरीट सोमय्या दहशतवादी आहेत, बलात्कारी आहेत की दरोडेखोर, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
“किरीट सोमय्यांना तुम्ही का अटक करणार आहात? त्याचं कारण द्या. अजूनही किरीट सोमय्या यांना लेखी नोटीस देण्यात आलेली नाही. किरीट सोमय्या वारंवार सकाळपासून नोटीस द्या, अशी मागणी करत आहेत. कधी आयजी समजवण्याचा प्रयत्न करतात. किती यंत्रणा दबावाखाली काम करतेय. गेल्या तीन दिवासांपासून मी लांबून पाहतोय. किरीट सोमय्या यांना मुंबईतल्या गणपती विसर्जनाला जाऊ दिलं जात नाहीय. त्यापेक्षा आणीबाणीच घोषित करा”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“माझं आणि सोमय्या यांचं सातत्याने बोलणं सुरु आहे. सोमय्या हे इतके आक्रमक नेते आहेत की ते असल्या दडपशाहीला घाबरनार नाहीत. जेव्हा झेड सुरक्षा नव्हती तेव्हाही ते फिरत होते. ज्यांना झेड सुरक्षा आहे त्यांना फिरायला बंदी करताय? किरीट सोमय्या उद्या हायकोर्टात जातील. ज्यांना झेड सुरक्षा आहे त्यांना तुम्ही फिरायला बंदी करताय तर तुम्ही सर्वसामान्यांचं वाटोळंच करणार”, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला.
नेमकं प्रकरण काय?
किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर दौऱ्याला जाण्याचं नियोजन केलं आहे. ते उद्या (२० सप्टेंबर) कोल्हापूरला दाखल होणार आहेत. पण त्याआधीच त्यांना मुंबईत स्थानबद्ध करण्यात आलं आहे. तसेच त्यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस बजावली आहे. त्यामध्ये त्यांनी सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. पण किरीट सोमय्या हे कोल्हापुरला जाण्यावर ठाम आहेत. सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे सोमय्या उद्या मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यातही जाणार आहेत. त्यावर मुश्रीफ समर्थकांनी तुम्ही येऊनच दाखवा, असा इशारा दिलाय. याच पार्श्वभूमीवर सोमय्या यांच्यावर मुंबईत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या घराबाहेर मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यावर सोमय्या यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.