नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) नांदेड गावाच्या परिसरात मागील काही दिवसात हिंस्त्र प्राण्याने तीन जनावरांचा फडशा पाडल्याचे आढळून आले आहे. यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
नांदेड गावाजवळील गुरखेडा शिवारात आतापर्यंत शेतकऱ्यांची तीन गुरंढोरांचा अज्ञात हिंस्त्र प्राण्याने फडशा पडल्याचे आढळून आले आहे. देविदास कोळी, जनार्धन गोसावी आणि सतिश कोळी या तीन शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचा या हल्ल्यात जीव गेला असल्याचे कळते. तसेच घटनास्थळी बिबट्याच्या पायाच्या पंजाशी मिळते-जुळते ठसे पण काही लोकांना आढळून आले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे परिसरात भविष्यात माणसांवर सुद्धा हल्ला होण्याची भीती वर्तवली जात आहे. बिबट्या असल्याचे भीतीने मजूर शेतात कामाला जात नाहीय. तरी संबंधित विभागाने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. दरम्यान, नांदेड परिसरात आज सकाळी वन विभागाचे अधिकारी गस्त घालून नेमकं काय प्रकरण आहे?, याची माहिती घेत असल्याचेही कळते.
धरणगाव तालुक्यात याआधी साधारण चार वर्षापूर्वी जांभोरे शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार झाल्या होत्या. गावातील बापू लाला बडगुजर यांच्या शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी मजूर राहूल ठाकूर गेला होता. त्यावेळी त्याला बिबट्या शेळी खाताना दिसला होता. तर मागील वर्षी निंभोरा गावाच्या पूर्वेस चोरगाव रस्त्यालगत शरद जनार्दन कोळी यांच्या शेतातील गोठ्यात बिबट्याने गाईचे वासरूचा फडशा पाडला होता.