मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगानं ९२ नगरपालिकांची निवडणूक जाहीर केली आहे. आता १८ ऑगस्ट रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. १७ जिल्ह्यातील कमी पाऊस पडणाऱ्या नगरपालिका क्षेत्रांमध्ये निवडणूक पार पडणार आहे.
कोणत्या 17 जिल्ह्यांचा समावेश?
जळगाव, पुणे, सोलापूर, जालना, बीड, उस्मानाबाद, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, लातूर, बुलढाणा, या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. मुख्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंगकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या निवडणुकीसाठी मतदान 18 ऑगस्टला मतदान आणि 19 ऑगस्टला निकाल जाहीर होणार आहे. ही निवडणूक ओबीसी आरक्षणाविना होईल का यासंदर्भात तर्क वितर्क लावले जात आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
22 जुलै ते 28 जुलै दरम्यान उमेदवारी अर्ज 11 ते 2 या वेळेत दाखल करता येणार.
29 जुलैला दाखल उमेदवारांची उमेदवारी अर्जांची छाननी होईल.
4 ऑगस्टला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे अंतिम तारीख.
18 ऑगस्ट रोजी मतदान होणार
19 ऑगस्टला निकाल जाहीर करण्यात येणार.
















