धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गरीब कुटुंबातील शेतकरी दाम्पत्यांच्या शेतातील चक्क २०० कापसाची झाडं अज्ञात माथेफिरूने उपटुन शेतातच फेकून दिल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. पिकांचे नुकसान बघून शेतकरी दाम्पत्यांना अश्रू अनावर झाले होते. या घटनेमुळे शेतकरी दाम्पत्य हवालदिल झाले असून नुकसान भरपाई मिळण्याची आस धरून आहेत.
येथील गरीब कुटुंबातील शेतकरी पंडित धोंडू अहिरे यांनी शेतात कापसाचे बियाणे लागवड केली होती. राबराब राबून त्यांनी शेताची मशागत करून कापसाचे बीज लावून कापसाची रोपांची वाढ केली परंतु, त्यांच्या शेतात अज्ञात माथेफिरूने चक्क २०० कापसाची झाडं उपटुन शेतातच फेकून दिली आहेत. यामुळे पंडित धोंडू अहिरे या शेतकर्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. या गरीब शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी त्यांची मागणी आहे. गावातील पंच मंडळी शेतात झालेला प्रकार बघायला गेले असता पंडित धोंडू अहिरे व त्यांची पत्नी लताबाई पंडित अहिरे या दोघांनी शेतात उपस्थित नागरिकांसमोर टाहो फोडला व रडायला सुरुवात केली. त्या दोघांना पिकांचे नुकसान बघून अश्रू अनावर झाले. झालेल्या घटनेमुळे पंडित धोंडू अहिरे हे हवालदिल झाले आहेत. आता माझ्याजवळ आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले. परंतु, तेथे उपस्थित असलेले ग्रामस्थांनी त्यांची समजूत काढून त्यांना धीर दिला व आपण या घटनेची गावातून चौकशी करू व तुम्हाला नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करू असे त्यांना आश्वासित केले.
यावेळी शेतात गावाचे सरपंच किरण गोकुळ पाटील, उपसरपंच अजय ताणकु ब्राह्मणे, भावडू महाजन, शारीरिक मालचे आदी गावांतील शेतकरी नागरिक उपस्थित होते.