मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणावरून राज्याच्या राजकारणात वातावरण तापलं आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद मागे घेतल्याचं सुरेश पाटील यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र आरक्षणाबाबत ठेस निर्णय होत नाही तोपर्यंत MPSC परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. उदयनराजेंनी फेसबुक पोस्ट लिहित सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे.
उदयनराजेंची फेसबुक पोस्ट
“महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली आहे. तरीही सरकारने 11 ऑक्टोबरलाच परीक्षा घेण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे. एकीकडे राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असताना तसेच मराठा आरक्षण स्थगितीचा निर्णय आलेला असतानासुद्धा सरकारला एमपीएससी परीक्षा घेण्याची एवढी घाई का आहे? जर सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तात्काळ घेतला नाही तर त्याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील. मराठा समाज हा जितका संयमी आहे, तितकाच तो आक्रमकही आहे. याची जाणीव ठेवून सरकारने एमपीएससीच्या परीक्षेसाठी संपूर्ण मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नये,” असा इशारा उदयनराजेंनी दिला आहे.
“येत्या 11 तारखेला एमपीएससीची परीक्षा घेतल्यास मराठा तरुणांचे न भरून येणारे मोठे नुकसान होणार आहे. तरीही सरकारने ही परीक्षा घेण्याची अन्यायकारक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर लगेच 15 हजार जागा भरण्याची सरकारला एवढी घाई का झाली आहे? आरक्षणाच्या स्थगितीमुळे मराठा समाजात प्रचंड मोठी चिड निर्माण झालेली आहे. तरीसुद्धा मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य लोकसेवा आयोग आणि राज्य सरकार करत आहे,” अशी टीका उदयनराजेंनी केली आहे.