नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. तसेच एकदा सुधारणा करून लाभ होतोय का नाही हे पाहायला हवं, त्रुटी असेल ती दुरुस्त करूया.. यामुळे बाजारपेठ आधुनिक होईल, स्पर्धा वाढेल त्याचसोबत MSP आहे, राहील आणि यापुढे राहणार आहे, चर्चेची दारं कायम उघडी आहे, आंदोलन थांबवावे’ असं आवाहन पंतप्रधान मोदींनी राज्यसभेतून केले आहे.
राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन सादर करत कृषी कायदे आणि आंदोलकावरून भाष्य केले. ‘कृषीमंत्री तोमर हे शेतकरी आंदोलकांशी बोलत आहे, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजून कोणताही तणाव निर्माण झालेला नाही. आंदोलन करणे तुमचा हक्क आहे, पण वयोवृद्ध शेतकऱ्यांनी तिथे बसवणे योग्य नाही. तुम्ही आंदोलन मागे घेतल्यानंतर सुद्धा चर्चा करू शकता. चर्चा करण्यासाठी मी राज्यसभेच्या माध्यमातून निमंत्रण देत आहे. चर्चेतूनच मार्ग सुटणार आहे, असं आवाहनही मोदींनी केले. ‘ही गोष्ट निश्चित आहे, शेती विकसित करण्यासाठी आपल्याला निर्णय घ्यावे लागणार आहे, आपल्याला पुढे जायचे आहे, मागे जायचे नाही. विरोधक असेल किंवा आंदोलक असेल सर्वांना सुधारण्यासाठी संधी दिली पाहिजे. तसंच, एमएसपी आहे, एमएसपी कायम राहणार आहे. देशातील लोकांना स्वस्त धान्य दिले जात आहे, ते कायम राहणार आहे, असंही त्यांनी ठामपणे सांगितले.
मनमोहन सिंग यांच्या भाषणाचा उल्लेख
नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणातील मुद्देच राज्यसभेत वाचून दाखवले. ‘शेतकऱ्यांना पिक विकण्यासाठी स्वातंत्र्य, भारताला स्वतंत्र्य कृषी बाजार मिळवून देण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले होते. आता त्यांनी जे सांगितले होते तेच आम्ही करत आहे. उलट तुम्हाला याबद्दल अभिमान वाटायला हवा होता, असा टोलाही मोदींनी लगावला.
मोदी है मौका लिजिए
संसदेत चर्चेच्या माध्यमातून अनेकांनी भाष्य केले, त्यांचा राग व्यक्त केला, माझ्यावरही टीका झाली, केवढं बोललं गेलं, मी तुमच्या कामी आलो याचा मला आनंद आहे. माझ्यावर राग काढल्यानं तुमचा केवढा राग हलका झाला असेलअसा आनंद घेत राहा, चर्चा करत राहा, मोदी आहे संधी घ्या टीका करत राहा, आनंद घ्या…याठिकाणी मनातील राग बाहेर काढल्यानंतर घरी निवांत शांततेत राहता येत असेल असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला.