जळगाव (प्रतिनिधी) नांदेड जिल्ह्यात मुंबई एनसीबीच्या पथकाने गांजाने भरलेला ट्रक प्रकरणाची आज ‘जळगाव कनेक्शन’ची इनसाईड स्टोरी समोर आल्यानंतर पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे एनसीबीचे पथक कासोदा-वनकोठा परिसरावर नजर ठेऊन असून काही दिवसापूर्वी एका तरुणाची कसून चौकशी केल्याचे देखील कळतेय.
सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक
मुंबई एनसीबीने नांदेड जिल्ह्यातील नांदेड-हैदराबाद मार्गावर गुप्त माहितीच्या आधारे मंजराम (तालुका – नायगाव) येथे कारवाई केली होती. त्यानुसार १५ नोव्हेंबरला पहाटेच्या वेळी केलेल्या या कारवाईत एनसीबीने १२ चाकी ट्रक ताब्यात घेतला होता. यातून एकूण तब्बल ११२७ किलोग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाचे बाजारमूल्य तब्बल ७ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आलय. या तपासणीत प्रत्येकी २० किलो गांजा असलेली ४३ पोती, तर २४ किलो गांजा असलेली ५ पोती एनसीबी पथकाला आढळून आली होती. मुंबई एनसीबीने केलेल्या सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक मानली जात आहे. दरम्यान, या कारवाईचे जळगाव कनेक्शनची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.
गांजाचे कनेक्शन पोहचले कासोदा-वनकोठा परिसरात
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार नांदेड येथे पकडण्यात आलेला ट्रक जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ जाणार होता. परंतू एरंडोलजवळ नेमकं कोणत्या गावाला हा माल उतरवला जाणार होता?, याची निश्चित माहिती कुणाकडेही नव्हती. परंतू आता गांजाचे कनेक्शन एरंडोलपासून जवळ असलेल्या वनकोठे-कासोदा परिसरात पोहचले आहे. गावातील ‘नंदू’ नामक तरुण हा व्यवसायात गुंतलेला असल्याचे कळते. या तरुणाचे मोठे प्रस्थ असल्याचे देखील कळतेय.
कासोदा-वनकोठा परिसरावर एनसीबीची नजर ; एकाची चौकशी
कासोदा-वनकोठा परिसरावर एनसीबीची नजर असल्याची माहिती देखील समोर येत आहे. कारण कासोदा-वनकोठा येथील काही जणांवर एनसीबीची अनेक दिवसापासून नजर ठेऊन असून यातील वनकोठे येथील नंदू नामक व्यक्तीची त्यांनी काही दिवसांपूर्वी चौकशी केल्याचे देखील कळतेय.
दुसरीकडे मे २०१७ मध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या चौघांना दौलताबाद पोलिसांनी अटक केली होती. यात संशयित आरोपी नंदलाल रतन बेलदार (वय २५ रा. वनकोठे, ता. एरंडोल, जि. जळगाव), सुनील रघुनाथ मोहिते (वय ३६ रा. भालगाव, ता. एरंडोल, जि. जळगाव), विनोद नथ्थू सोळंके (वय ३२ रा. अजबनगर, माळीगल्ली औरंगाबाद) व इफ्तेकार हारूण कुरेशी (वय ३० रा. सिल्लेखाना, औरंगाबाद) यांना पोलिसांनी अटक केली होती. त्याचपद्धतीने जुलै २०२१ मध्ये अमळनेरचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी धरणगाव- सावखेडा रस्त्यावर कारमधून जाणारा ४० किलो गांजा पकडला होता. यावेळी चालक आकाश रमेश इंगळे (रा. मरिमातानगर, एरंडोल) व त्याच्यासोबत कासोदा येथील इस्लामपुरा भागातील शकिल खान अय्यूब खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच याच भागातील एका पोलिस पाटलाला ओडिशा राज्यात गांजा तस्करी प्रकरणात अटक झाली होती आणि तो सध्या कारागृहात असल्याचे कळते. त्यामुळेच वनकोठा-कनेक्शन प्रामुख्याने समोर आले आहे.
एरंडोलजवळील एकाची चौकशी झाली असल्याचे कळते. परंतु याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
-डॉ.प्रवीण मुंढे
पोलीस अधीक्षक, जळगाव
विजय वाघमारे (9284058683)