मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान मोदी व अमित शहा इतर वेळी राहुल गांधींपासून ममता बॅनर्जींपर्यंत राजकीय विरोधकांवर बरसत असतात, पण दिल्लीत २६ जानेवारी रोजी इतका मोठा हिंसाचार झाला, त्यावर ना पंतप्रधान बोलले ना आपले गृहमंत्री, अशा शब्दांत संजय राऊत यांनी मोदी, शहांवर हल्ला चढवला आहे. दिल्लीत २६ जानेवारी रोजी घडलेल्या हिंसाचाराचे देशभरात पडसाद उमटले आहेत. शेतकरी आंदोलनात पंतप्रधानांनी घेतलेल्या भूमिकेवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारावर भाष्य केलं आहे. “शेतकऱ्यांचा एक गट दिल्लीत घुसला व त्याने दंगल केली. राज्यकर्त्या पक्षाच्या प्रेरणेनेच जेव्हा दंगली होतात, तेव्हा अहिंसेवरील प्रवचने उपयोगी पडत नाहीत. शेतकऱ्यांचे आंदोलन कसे राष्ट्रद्रोही आहे यावर भाजपाचा ‘आयटी’ विभाग आता समाज माध्यमांवर प्रवचने झोडत आहे. पण शेवटी पंतप्रधान, गृहमंत्री यांची काही जबाबदारी आहे की नाही? पुन्हा मोदी व शहा हे इतर वेळी राहुल गांधींपासून ममता बॅनर्जींपर्यंत राजकीय विरोधकांवर बरसत असतात, पण दिल्लीत २६ जानेवारी रोजी इतका मोठा हिंसाचार झाला, त्यावर ना पंतप्रधान बोलले ना आपले गृहमंत्री. मोदी व शहा हे आज प्रमुख घटनात्मक पदांवर बसून देशाचे नेतृत्व करीत आहेत. पंजाबच्या शेतकऱ्यांशी असे वागणे म्हणजे देशात अशांततेची नवी ठिणगी टाकणे आहे,” असा इशारा राऊत यांनी दिला आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन सध्या महत्त्वाचा मुद्दा बनलं आहे. दिल्लीचं राजकारण शेतकरी आंदोलनाभोवती फिरत आहे. त्यातच प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानं शेतकरी आंदोलनाला नवं वळण मिळालं आणि त्यानंतर दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलन स्थळी परिस्थिती तणावपूर्वक बनली आहे. या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी, शाह यांची काही जबाबदारी आहे की नाही?, असा थेट सवाल पंतप्रधान व गृहमंत्र्यांना केला आहे.
राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनाही प्रश्न विचारला आहे. “मंगळवार दि. २६ जानेवारी २०२१ रोजी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले शेतकरी सरळ दिल्लीत घुसले व त्यांनी काही काळासाठी लाल किल्ल्याचा ताबा घेतला. दिल्लीच्या रस्त्यांवर आणि लाल किल्ल्यावर काही काळासाठी ‘युद्ध’ परिस्थितीच निर्माण झाली. ‘हे धर्मयुद्ध आहे’ असा शेरा यावर कुणीतरी मारला. दिल्लीच्या सीमेवर ६० दिवसांपासून जे शेतकरी जमले आहेत, त्यांना कोणताही धर्म नाही व राजकीय पक्ष नाही. आपली शेती, पुढच्या पिढीचे भविष्य कॉर्पोरेट दलालांच्या हाती जाऊ नये यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेतकरी हिंसक झाले व त्यांना तशी चिथावणी देण्यात आली. हे चिथावणी देणारे व शेतकऱयांना लाल किल्ल्यात घेऊन जाणारे नेते शेवटी भाजप परिवारातील निघावेत यासारखा विनोद तो कसला?,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी पंजाबच्या शेतकऱयांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत आला. हजारो शेतकरी राजभवनाला धडक देण्यासाठी निघाले. त्यांना अडवून ठेवले. शेतकऱ्यांचे नेते राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन देण्यास निघाले तेव्हा आपले महामहिम राज्यपाल हे गोव्याच्या दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले. एरवी आपले राज्यपाल राज्याचे व लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःच पुढाकार घेत असतात, पण हजारो शेतकरी स्वतःच आपले प्रश्न घेऊन राजभवनाकडे निघाले तेव्हा शेतकऱयांचे प्रश्न सोडविण्याची आयतीच संधी नाकारून राज्यपाल गोव्यास गेले.