नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशाला सावधानतेचा इशारा दिला आहे. भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावाच लागणार आहे. नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाऊनचा काहीच फायदा नाही, असं डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडकडीत लॉकडाउन लागू करण्याची आवश्यकता आहे, असंही गुलेरिया यांनी स्पष्ट केलं.
‘इंडिया टुडे’ने डॉ. रणदीप गुलेरिया यांची मुलाखत घेतली आहे. त्यात त्यांनी हा इशारा दिला आहे. तसंच यावेळी त्यांनी देशातील परिस्थिती, त्यामागील कारणं, नाईट कर्फ्यू, वीकेंड लॉकडाउन आणि कडक लॉकडाउन लागू करण्याबाबत भूमिका मांडली. डॉ. गुलेरिया म्हणाले,”आता तीन गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे. पहिली म्हणजे रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणं. दुसरी, आक्रमक कार्यपद्धती स्वीकारून रुग्णसंख्या कमी करणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात लसीचं उत्पादन. आपल्याला विषाणू संसर्गाची साखळी तोडावी लागणार आहे. जर आपण माणसामाणसांतील संपर्क टाळू शकलो, तर रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता आहे,” असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे.
“माणसांचा संपर्क टाळायचा म्हणजे आपण त्याला लॉकडाउन म्हणू शकतो. युकेप्रमाणेच लॉकडाउन लागू करावा लागेल. मग तो राज्यांच्या पातळीवर असो वा राष्ट्रीय पातळीवर. हे सगळं धोरणकर्त्यांना (सरकार) ठरवावं लागणार आहे. कारण माणसाचं जीवन आणि त्याचा उदरनिर्वाह याची नीटपणे हाताळणी करण्यासंदर्भातील हा मुद्दा आहे आणि अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याचाही. त्याचप्रमाणे दररोज मजूरी करून पोट भरणाऱ्याचाही मुद्दा आहे. पण, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडकडीत लॉकडाउन आवश्यक आहे,” असंही गुलेरिया यांनी स्पष्ट केलं.
“फक्त रुग्णालयातील पायाभूत सुविधांवर भर देऊन चालणार नाही, तर रुग्णसंख्या कमी करण्यावरही लक्ष द्यावं लागेल. वीकेंड लॉकडाउन आणि नाईट कर्फ्यू लागू करणं निरर्थक आहे. जर आपण लॉकडाउन लागू करण्याबद्दल म्हणाल, तर तो पुरेशा कालावधीसाठी असला पाहिजे. कमीत कमी दोन आठवड्यांसाठी तरी. हा लॉकडाउन कडकडीत असायला हवा. जर रुग्णसंख्या लवकर घटली, तर आपण तो लवकरही उठवू शकतो,” असंही डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केलं.
रुग्णवाढीला ब्रेक
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या २४ तासांत ३ लाख ५७ हजार २२९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही २ कोटी ०२ लाख ८२ हजार ८३३ पर्यंत पोहोचली आहेत. तर दुसरीकडे ३,४४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना मृतांचा आकडा हा २ लाख २२ हजार ४०८ इतका झाला आहे. तसेच भारतातील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे.