मुंबई (वृत्तसंस्था) होम लोन, कार लोन आणखी स्वस्त होण्याची चिन्हे नाहीत. कारण रिझर्व्ह बॅंकेने आपल्या पतधोरण बैठकीनंतर व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. व्याजदर जैसे थे राहणार आहेत. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांसा दास यांनी पतधोरण समिती बैठकीनंतर सांगितले की रेपो रेट ४ टक्के ठेवण्यात आले आहेत. शिवाय रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्केच ठेवण्यात आले आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरणाविषयी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. यानुसार, देशातील रेपो रेट ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय, रिव्हर्स रेपो रेट देखील ३.३५ टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. याआधी देखील ६ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीमध्ये देखील हे व्याजदर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
“देशातील महागाईचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी, कोविड १९ चा अर्थव्यवस्थेवरील परिणाम नियंत्रित करण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती पूर्ववत येईपर्यंत देशाचं पतधोरण सर्वसमावेशकच ठेवलं जाईल”, अशी प्रतिक्रिया शक्तिकांत दास यांनी दिली आहे. भारतीय अर्थव्यवस्था आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. गेल्या पतधोरण आढावा बैठकीच्या तुलनेत अर्थव्यवस्था काहीशी सावरली आहे. विकासदराच्या बाबतीत देखील सकारात्मक चिन्ह दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था लवकरच पूर्वपदावर येण्याची आशा आहे, असं देखील शक्तीकांत दास यांनी नमूद केलं.
दरम्यान, यावेळी बोलताना शक्तीकांत दास यांनी देशाचा विकासदर चालू आर्थिक वर्षात अर्थात २०२१-२२ मध्ये ९.५ टक्क्यांवर राहील, असा अंदाज वर्तवला आहे. दुसऱ्या तिमाहीत ७.९ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ६.८ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ६.१ टक्के असा विकासदर राहील, असं देखील शक्तीकांत दास म्हणाले.