जळगाव (प्रतिनिधी) आता निधी येईल, तेव्हा येईल अशा बतावण्या न करता आम्ही वल्गनांवर नव्हे तर प्रत्यक्ष कामांवर भर देतो. यामुळे जळगाव शहरातील रस्त्यांसाठी १२० कोटी रूपयांच्या निधीचा मार्ग मोकळा झाला असून याच्या कामास शुभारंभ करण्यात आला आहे. तर उर्वरित निधीचा पाठपुरावा सुरू असून शहरासाठी तब्बल पावणे दोनशे कोटी रूपयांची कामे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये २ आज १ कोटी ३५ लक्ष रूपयांची तरतूद असणार्या तीन रस्त्यांच्या भूमिपुजनाप्रसंगी पालकमंत्री म्हणाले की, जळगाव शहराच्या विकासाचे व्यापक व्हिजन लक्षात घेऊन आम्ही कोणतीही आव न आणता प्रत्यक्ष कामे करून दाखवत आहोत. जळगाव शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. तर नितीन बरडे हे जनतेच्या कायम संपर्कात राहून कामे करणारे नगरसेवक असल्याचे नमूद करत ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर जयश्री महाजन होत्या.
जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये २ कोटी ७५ लक्ष रूपयांची विकासकामे मंजूर झालेली आहेत. यातील १ कोटी ३५ लाख रूपयांच्या निधीतून स्टेट बँक कॉलनी आणि पवन हिल्स परिसरातील एकूण तीन रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक अनंत जोशी, प्रशांत नाईक, कुंदन काळे, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, महिला महानगराध्यक्षा शोभा चौधरी, सरीता माळी-कोल्हे , डॉ कमलाकर पाटील, मुकेश सोनवणे आदींची उपस्थिती होती.
नगरसेवक नितीन बरडे यांनी आपल्या मनोगतातून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे आम्ही विकासनिधीसाठी शब्द टाकल्याबरोबर त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी भरभरून निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र ठाकरे यांनी केले तर आभार नितीन बरडे यांनी मानले. यावेळी प्रभागातील नागरिकांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
जळगाव विकासासाठी असा मिळाला निधी
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी जळगाव शहरासाठी जिल्हा नियोजन मंडळातून ६१ कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. तर अलीकडेच नगरविकास खात्याच्या माध्यमातून ४१ कोटी रूपयांचा निधी देखील मिळालेला आहे. यासोबत रस्त्यांसाठी २० कोटी रूपयांचा निधी मिळालेला आहे. तर उर्वरित निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. या माध्यमातून जळगाव शहरात तब्बल पावणे दोनशे कोटी रूपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून आज जळगावातील भूमीपुजनाच्या माध्यमातून याला प्रत्यक्षात प्रारंभ झाला आहे.