मुंबई (वृत्तसंस्था) एमआयएम सोबत महापालिका निवडणुकीत जाणार नाही. आम्ही शिवसेनेसोबत युती करायला तयार आहे, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग सोबत आघाडी करणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. तीन पक्ष मिळून जानेवारीच्या मध्यापर्यंत जागावाटप जाहीर करणार असल्याची घोषणा केली आहे. यासोबतचं आणखी काही पक्ष देखील आमच्यासोबत येत आहेत. त्यानुसार आम्ही आमच्या जागा वाटप करणार आहोत. उद्या आम्ही प्रचाराला सुरवात करत आहोत, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार संविधानात नाही. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय जे करत आहे ते घटनाविरोधी आहे. वारंवार कोव्हिडच्या नावाखाली निवडणुका पुढे ढकलणे चुकीचं आहे. आणीबाणी जरी घोषित होणार असेल तरी निवडणूका पुढे ढकलता येत नाहीत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, आम्ही मुंबईच्या पातळीवर एक पर्याय उभा करत आहोत. काँग्रेस सोबत युती करायला आम्ही तयार आहोत. आम्ही त्यांना सतत म्हटलं होत की, तुम्ही ज्या जागा हरलेल्या आहात त्या आम्हाला द्या अशी मागणी केली आहे. काँग्रेसच्या मनात भीती आहे की हरलेल्या जागा हे जिंकतात त्यामुळे आपलं पुढं जाऊन काय होणार असा त्यांना प्रश्न सतावत आहे. त्यामुळे ते युती करायला घाबरत आहेत. म्हणूनच आम्हाला भाजपची बी टीम काँग्रेसने म्हटलं होतं. आम्ही काँग्रेससोबत युती करायला तयार आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
राज्य सरकार ओबीसींना फसवत आहेत. त्यांना माहिती होती की ओबीसी आरक्षणासाठी लागू करण्यात आलेला वटहुकूम कोर्टात टिकणार नाही. तरीदेखील त्यांनी वटहुकूम काढला. आम्ही एमआयएम सोबत महापालिका निवडणुकीत जाणार नाही. आम्ही शिवसेनेसोबत युती करायला तयार आहोत परंतु ते आमच्या सोबत येतील का हा प्रश्न आहे. आम्ही सेक्युलर पार्टीसोबत युती करायला तयार आहोत. शिवसेनेसोबत युती करायला आम्ही तयार आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.