नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेचा आज आढावा घेतला. देशात लसीकरण धिम्या गतीनं सुरू असल्यानं पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली आहे. देशातील १३ राज्यांमध्ये ४८ जिल्हे असे आहेत, जिथे कोरोना लसीकरणातील पहिला डोस ५० टक्के पण झाले नाही आहे. त्यामुळे गावागावात लसीकरण करण्याचे नियोजन करा. घरोघरी लसीकरण मोहीम राबवा,’ असे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेतली. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस ५०% पेक्षा कमी दिलेल्या आणि दुसऱ्या डोसची व्याप्ती अत्यंत कमी असलेल्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीला व्हर्चुअली उपस्थित होते. सोबतच झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.
बैठकीनंतर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, लसीकरणाच्या मोहिमेला अजून वेग द्यायचा आहे. आता ‘हर घर टीका, घर घर टीका’ याअंतर्गत लसीकरण मोहिम चालवली जाईल. लसीकरणासाठी धर्मगुरुंची मदत घ्या. धर्मगुरुंचे लसीकरणासंबंधीचे व्हिडीओ व्हायरल करा तसेच एनएसएस, एनसीसीची मदत घ्या, असंही आवाहन मोदी यांनी केलं. बिरसा मुंडा जयंतीला आदिवासी बहुल भागात विशेष लसीकरण मोहिम चालवा असं आवाहनही त्यांनी केला. मोदी यांनी म्हटलं आहे की, १०० वर्षातील सर्वात मोठ्या महामारीनं देशासमोर अनेक आव्हानं उभी केली आहेत. आता आपापल्या जिल्ह्यात लसीकरण वाढवण्यासाठी इनोव्हेटीव्ह पद्धतीवर जास्त काम करावं लागेल, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पीएम मोदी यांनी म्हटलं की, प्रत्येक घरी जाऊन लस देत असताना पहिल्या डोससह दुसऱ्या डोसवर देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कोरोनाच्या केस कमी झाल्यावर आपण हलगर्जीपणा करतो. लस घेण्याची घाई करण्याची मानसिकता कमी होते. तसं न करता प्रत्येकानं लस घ्यावी, असंही मोदी म्हणाले.
औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लसीकरण वाढविण्यासाठी कुठली पाऊले प्राधान्याने उचलत आहोत याची माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन कवच कुंडल अभियान राबवून लसीकरण वळवले असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.