अमरावती (वृत्तसंस्था) वरूड तालुक्यातील तिवसाघाट लगत पिंपळशेंडा शेतशिवारात बिबट्याने हल्ला करून शेतकऱ्याला ठार केल्याची घटना रविवारी रात्री साडेसात वाजता घडली. माधव राजाराम बानाइत (वय ७० रा. शेंदूरजनाघाट) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
माधव राजाराम बानाइत हे पिंपळशेंडा शेतशिवारात गेले होते. परंतु रात्र होऊन परत आले नाही, त्यामुळे बानाईत यांच्या मुलाने शेतात जाउन पाहिले असता वडिलांचा मृतदेह दिसला. त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढविल्याचे लक्षात येताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळावर शेंदूरजना घाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश इंगळे यांनी पंचनामा केला.
घटनेची दखल घेत सोमवारी सकाळी प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी, वनपाल अजय खेडकर, मंगेश जंगले आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. माधव बानाईत यांच्या वारसाला पाच लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. वन विभागाच्या अंदाजानुसार हा हल्ला बिबट्याने केला असावा. मात्र घटनास्थळी पायाचे ठसे आढळून आले नाही. त्यामुळे मृत शेतकऱ्यावर हल्ला वाघाने की बिबटाने केला, हे कळू शकले नाही.