नागपूर (वृत्तसंस्था) आजारी पत्नीला कंटाळून एका पतीने थेट गळा चिरून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दि. १४ नोव्हेंबर रोजी एका अज्ञात महिलेचा मृतदेह नवीन गुमगाव येथील शेतात सापडला होता. तपासादरम्यान मयत महिलेच्या पतीनेच तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. सावित्री पटले (वय ४२) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी तिचा पती देवराम (वय ४७) याच्यासह त्याचे सहकारी राजू चौधरी (वय ४४, बालाघाट) व मुन्ना ऊर्फ मुनीर शेख (वय ५१, मकरधोकडा) यांना अटक केली आहे.
शेतात रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता मृतदेह !
मुख्य आरोपी पती देवराम हरिश्चंद्र पटले, तर राजू उर्फ रामा बालाराम चौधरी, मुनिर अजगर शेख, अशी आरोपींची नावे आहेत. मृतक व आरोपी पती दोघेही मूळचे रावणवाडी, गोंदिया येथील रहिवासी आहेत. त्यांना एक १७ वर्षांची मुलगी व १९ वर्षांचा मुलगा असून दोघेही रावणवाडी येथे नातेवाइकांजवळ राहतात. दोन महिन्यांपूर्वी देवराम हा पत्नी सावित्रीला घेऊन नागपुरातील बुटीबोरीला कामाच्या शोधात आला होता. ही खुनाची घटना १३ नोव्हेंबर रोजी रात्री घडली होती. दुसऱ्या दिवशी १४ तारखेला दुपारी दोन वाजता उघडकीस आली. हिंगणा हद्दीतील गुमगाव- वडगाव समृद्धी मार्गावरील एका शेतात एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. घटनेची माहिती शेतमजुरांनी हिंगणा पोलिसांना दिली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
मानसिक संतुलन ढासळल्याने केला खून !
देवराम हा पत्नी सावित्रीसह गोंदिया रावणवाडीवरून दोन महिन्यांपूर्वी नागपुरात आला होता. त्याच्या म्हणण्यानुसार, पत्नी सावित्रीचे वर्ष २००९ पासून मानसिक संतुलन ठीक नव्हते. त्यामुळे सततच्या त्रासामुळे तो त्रस्त झाला होता. एवढेच नव्हे तर पत्नीमुळे त्याला भाड्याची खोलीसुद्धा सोडावी लागली होती. परिसरातील नागरिकांनासुद्धा ती त्रास द्यायची. शेवटी देवरामने कायमच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी हत्येची योजना आखली. १३ नोव्हेंबरला पत्नीला दुचाकीवर बसवून समृद्धी मार्गावर आणले. सोबत त्याचे दोन मित्रसुद्धा दुसऱ्या मोटारसायकलने त्यांच्या पाठीमागे होते. येथे रस्त्याकडील भागात पत्नीला नेले आणि निर्जनस्थळी मित्रांच्या मदतीने तोंड दाबून ब्लेडने गळा चिरून तिची निर्घृण हत्या केली.
असा झाला खुनाचा उलगडा !
पोलिसांनी मृतक महिलेचे फोटो इतर पोलीस ठाण्यात पाठविले होते. तर आरोपीने पत्नी सावित्रीच्या नातेवाइकांना ती पळून गेल्याचे सांगितले होते. त्या नातेवाइकांचा संशय बळावला. त्यांनी आरोपीला तिची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यास सांगितले. तब्बल चार दिवसांनी १७ तारखेला त्याने बुटीबोरी ठाण्यात जाऊन मृत पत्नीची मिसिंग तक्रार दाखल केली होती. दरम्यान, पोलीस त्या महिलेच्या शोधात होतेच. या मिसिंग महिलेचे वर्णन मृतक महिलेशी जुळत असल्याने पोलिसांनी आरोपीला संपर्क केला. त्यानंतर आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देत स्वतः गोंदिया येथे असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी सोमवारी दुपारी गोंदिया येथून त्याला ताब्यात घेतले. त्यांनी आरोपीची आणखी चौकशी केली असतात्याने दोन साथीदारांची नावे सांगितली. त्यावरून दोघांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. आरोपीला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन तो प्तनीला मारहाण करायचा. त्याने व्यसनापायी घरदारसुद्धा विकले. नेहमीच्या भांडणाला कंटाळून दोन्ही मुले आपल्या मावशीकडे राहत होती. रोज दारू पिऊन घरी येत असल्याने पत्नीसोबत भांडण व मारहाण आरोपी करीत होता. मृतक ही वेडसर नव्हती, असेही नातेवाइकांनी सांगितले.
घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं !
ठरलेल्या प्लॅननुसार १३ नोव्हेंबर रोजी देवराम नातेवाइकांना गावी जाऊन भेटण्याच्या बहाण्याने सावित्रीला दुचाकीने घेऊन निघाला. राजू चौधरी आणि मुन्ना शेख हेही दुसच्या दुचाकीवर होते. आरोपी सावित्रीला घेऊन हिंगणा येथील घटनास्थळी पोहोचले. तेथे ब्लेडने सावित्रीचा गळा चिरून खून केल्यानंतर देवराम साथीदारांसह फरार झाला. देवरामने सावित्रीच्या घरच्यांना बोलावून ती अचानक गायब झाल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी त्याला पोलिसांत तक्रार देण्यास सांगितल्यावर देवरामने टाळाटाळ सुरू केली.