जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रभारी कुलगुरु यांनी प्र. कुलसचिव पदावर पुन्हा बेकायदेशीर नियुक्ती केल्याचा आरोप करत विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ आजपासून विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने काळी फित लावून घोषणाबाजी करत आंदोलन केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कायदा अधिकारी डॉ.एस.आर.भादलीकर यांची नियुक्ती फक्त पाच वर्षासाठी तात्पुरत्या स्वरुपात होती. त्यामुळे सदरचा कालावधी संपून बराचकाळ लोटला असल्यामुळे डॉ. भादलीकर यांची विद्यापीठातील कायदा अधिकारी पदावरील सेवा तातडीने समाप्त करावी, अशी मागणी विद्यापीठातील कृतिगटाने केलेली आहे. सदर मागणीकडे दुर्लक्ष करुन त्यांची पात्रता नसतांना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु यांनी त्यांची प्र.कुलसचिव पदावर पुन्हा बेकायदेशीर नियुक्ती केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यापीठातील कृतिगटाला प्राप्त माहितीनुसार कबचौउमवितील उमविसाठी कायदा अधिकारी हे पद फक्त तात्पुरत्या स्वरुपात पाच वर्षासाठी भरण्यात आले होते. पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नव्याने जाहिरात प्रकाशित करुन पुन्हा सदर पदासाठी नव्याने मुलाखती घेवून नेमणूक करणे आवश्यक होते. मात्र डॉ. भादलीकर यांच्याबाबत तसे काही केलेले दिसत नाही. उलटपक्षी एक महिन्यापुर्वी त्यांना प्र. कुलसचिव पदावरुन पायउतार करुन पुन:श्च दीड महिन्यांनंतर प्र. कुलसचिव पदावर नियमबाहयरित्या नेमण्यात आल्याचा कृती गटाचा आरोप आहे. याचा निषेध म्हणून आज कार्यालयीन वेळेपासून विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून कार्यालयीन कामे केलीत.
दु. १.३० ते २.०० या वेळेत झालेल्या व्दारसभेत कोविड-१९चा प्रादुर्भाव विचारात घेता सामाजिक अंतर ठेवून विद्यापीठ कृतिसमितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ प्रशासनाचा जाहिर निषेध व्यक्त करुन सामुहिक घोषणाबाजी देखील केली. तसेच या संदर्भात शासन स्तरावर कृतिगटाने दि. २५ सप्टेंबर २०२१ रोजी महामहिम कुलपती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्री यांना विद्यापीठात सध्या सुरु असलेल्या गैरकारभाराची चौकशी करणेबाबत सविस्तर पत्र पाठवून विनंती केली असून, शासन आता या संदर्भात काय निर्णय घेते?, याकडे विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. तसेच डॉ. एस.आर.भादलीकर हे विद्यापीठात वादग्रस्त ठरले होते. एवढेच नव्हे तर शैक्षणिकदृष्टया अपात्र असूनही त्यांना पुन्हा प्र. कुलसचिव पदावर का नियुक्त करण्यामागे मोठा आर्थिक गैरव्यवहार असण्याची शक्यता कृतीगटाने व्यक्त केली आहे. त्यामुळे विद्यापीठ कृति समितीने भादलीकर यांना पदावर दुर केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्राही कृती गटाने घेतला आहे.
















