धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री भवानी मातेच्या ऐतिहासिक यात्रोत्सवाचे आयोजन चैत्र महिन्याच्या १९ ते २५ दरम्यान करण्यात आले आहे. सदर यात्रोत्सव यंदा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. या दृष्टीने ज्येष्ठ सल्लागार हेमलालशेठ भाटिया यांच्या नेतृत्वाखाली मातेचे शेकडो सेवेकरी दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत.
पाच दिवस चालणारा हा यात्रोत्सव म्हणजे महिला, अबाल वृध्दांसाठी भक्ती आणि मनोरंजनाची पर्वणीच ठरणार आहे. यात्रोत्सवा दरम्यानच्या अडचणी आणि खर्चाच्या नियोजनाची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना देण्यासाठी मंगळवारी श्री भवानी मातेच्या ४० सेवेकऱ्यांनी शहरातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पाळधी येथे गुलाबरावचे निवासस्थान गाठले. यात्रेदरम्यान सुरक्षेचे सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना यंत्रांना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत.
तसेच मातेच्या सेवेसाठी मी तन, मन आणि धनासह उपस्थित राहील. तुम्ही फक्त यात्रोत्सवाचे नियोजन अतिशय सूक्ष्म पद्धतीने करा. मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला, वृद्ध, बालकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या, पैसा कमी पडणार नाही. तसे, तुम्ही सुद्धा तत्पर सेवा देण्यात कमी पडू नका, असा मोलाचा सल्ला गुलाबराव पाटील यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आशीर्वाद घेतलेल्या ऐतिहासिक श्री भवानी माता मंदिराच्या परिसराचा विकास करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. श्री भवानी मातेच्या सेवेकऱ्यांनी पुष्पगुच्छ देत ना. गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले.