मुंबई (वृत्तसंस्था) २०१८ साली परमबीर सिंग यांनी मोक्का लावून माझ्याकडून ३ कोटी ४५ लाख रुपये वसूल केले, असा आरोप क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंग यांच्यावर केला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप करणारे पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावरच आता पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासंदर्भात सोनू जालान याने पोलीस महासंचालक संजय पांडे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी हे प्रकरण तात्काळ राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
केतन तन्ना या व्यक्तीनेही परमबीर सिंह यांच्याकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप केला आहे. परमबीर सिंह यांनी आपल्याकडून १ कोटी २५ लाख रुपये उकळले. याप्रकरणी परमबीर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांची चौकशी व्हावी. याप्रकरणात आम्ही दोषी आढळलो तर आमच्यावर कारवाई करा, पण आम्हाला न्याय द्या, अशी मागणी केतन तन्ना यांनी केली आहे.