मुंबई (वृत्तसंस्था) राजकीय द्वेषापोटी आपला फोन रेकॉर्ड करण्यात आला असून, अधिकाऱ्यांनी फोन टॅप केलेला जो आवाज मला ऐकवला तो माझाच होता. असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्याचबरोबर कोर्टाच्या चार्जशीटमध्ये देखील याची नोंद येणार असल्याचं देखील नाना पटोले यांनी सांगितले आहे.
नाना पटोले यांनी चौकशीनंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी चौकशीत पोलिसांनी काय विचारलं याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली. अधिकाऱ्यांनी फोन टॅप केलेला जो आवाज आपल्याला ऐकवला तो आपलाच होता, हे नाना पटोले यांनी मान्य केलं. तसेच राजकीय द्वेषापोटी आपला फोन रेकॉर्ड करण्यात आला, असा दावा नाना पटोले यांनी केला. तसेच याबाबत कोर्टाच्या चार्जशीटमध्ये नोंद येणार, असंदेखील त्यांनी सांगितलं.
“DCP रँकच्या अधिकाऱ्यांनी माझा जबाब नोंदवला. माझं फोन रेकॉर्डिंग त्यांनी ऐकवलं. तो आवाज माझाच होता हे मी कबूल केलं. शेतकरी आंदोलन विषयक माझी भूमिका या फोन्स कॉलमध्ये होती. माझा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीच्या धोरणाला विरोध यात स्पष्ट होत होता. राजकीय द्वेषापोटी माझा फोन रेकॉर्ड करण्यात आला. कोर्टात चार्जशीटमध्ये याची नोंद येणार. ड्रग्जच्या धंदा करणारा अमजद खान असं नाव देऊन माझा कॉलचं रेकॉर्डिंग केलं. भाजपने पदाचा दुरुपयोग करुन हा व्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेला घाला आहे. मी अमजद खान, तर आताचे जय-विरु हे राजकीय खलनायक आहेत. पण आता तपासातून रश्मी शुक्ला यांचा बोलविता धनी समोर येणार आहे”, असं नाना पटोले म्हणाले.
दरम्यान, नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर ओबीसी आरक्षणावरुन आरोप केला. ते खोटे बोलताय आणि रेटून बोलतायत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला ग्रहण देवेंद्र फडणवीस सरकारमुळे लागलं. ओबीसी आरक्षणासहित निवडणूका घेण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चीफ जस्टीस यांना भेटले. कायदेशीर बाबींवर चीफ जस्टीस काय भूमिका घेतात हे समजेल”, असं नाना पटोले म्हणाले.