अमळनेर (प्रतिनिधी) मध्यरात्रीची वेळ…पोलिसांना पाहताच कार उलट्या दिशेने पळू लागली. मात्र, शेवटी पोलिसांनी पाठलाग करून गुन्हेगारांना पकडलेच. यानंतर कारची झाडाझडती घेतली असता त्यात तब्बल ५३ किलो गांजा आढळून आला.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे हे १७ नोव्हेंबरच्या रात्री गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. जळोद– अमळनेर रस्त्यावरून एक चारचाकीमध्ये गांजा विक्रीसाठी अमळनेर शहरात आणला जात आहे. हिरे यांनी तात्काळ डीवायएसपी राकेश जाधव यांना माहिती देऊन हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील, मिलिंद भामरे, दीपक माळी, रवींद्र पाटील, सूर्यकांत साळुंखे, चालक सुनील पाटील यांना घेऊन जळोद रस्त्यावर विजयनाना कृषी महाविद्यालयाजवळ सापळा लावला.
मध्यरात्रीनंतर १८ नोव्हेंबरच्या पहाटे १ वाजेच्या सुमारास एक पांढरी कार आणि त्याच्या पुढे मोटरसायकल येताना दिसली. यामुळे पोलिसांनी त्यांना अडवण्यासाठी यंत्रणा सतर्क करताच कार चालक आणि मोटरसायकल चालक यांनी वाहने वळवून उलट्या दिशेने पळू लागले. पोलिसांनी देखील लागलीच वाहनात बसून त्यांचा पाठलाग सुरू केला. बचावासाठी आरोपीनी आपली वाहने नन्दगाव रस्त्याला वळवली. आरोपीना आपण पोलिसांच्या तावडीत सापडू याची जाणीव झाल्याने त्यांनी चारचाकी खड्ड्यात टाकली आणि तेथून उतरून पळ काढला.
पोलीस वाहनाच्या प्रकाशात कारमधून उतरणारा आरोपी सराईत गुन्हेगार तौफिक शेख मुशिरोद्दीन (रा. गांधलीपुरा) हा असल्याची ओळख पटली. त्याच्यासोबत आणखी तीन अनोळखी आरोपी देखील पळून गेले. पोलिसांनी कारची डीक्की उघडली असता त्यात तीन गोण्यांमध्ये ८ लाख २ हजार ५०० रुपये किमतीची ५३ किलो ५०० ग्रॅम वजनाची २५ गांजाची पाकिटे आढळून आली. तसेच आरोपीनी सोडून दिलेली मोटरसायकल, दोन मोबाईल असा एकूण १२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.















