नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलेल्या तालिबानच्या समर्थनार्थ सोशल मीडियात पोस्ट करणं आसाममधील १४ जणांना महागात पडलं आहे. तालिबानचं समर्थन केल्याबद्दल आसाममधील विविध ठिकाणांहून एकूण १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार अटकेच्या कारवाईला काल रात्रीपासून सुरुवात झाली होती.
विशेष डीजीपी जी.पी. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार आसाम पोलिसांनी तालिबानच्या समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल १४ लोकांना अटक केली आहे. सिंह यांनी सांगितलं की या आरोपींनी देशातील कायद्यांचं उल्लंघन केलं आहे. आसाम पोलिसांनी लोकांना दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यापासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
एका अन्य पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिस सतर्क आहेत. सोशल मीडियावर जे वादग्रस्त पोस्ट टाकत आहेत, त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर आहे. पोलिसांनी सांगितलं की, कामरुप मेट्रोपॉलिटन, बारपेटा, धुबरी आणि करीमगंज जिल्ह्यातून आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसंच दरांग, कछार, हैलाकांडी, दक्षिण सलमारा, गोलपारा आणि होजई या जिल्ह्यातूनही काही आरोपींना अटक केली आहे.