जळगाव (प्रतिनिधी) शहरातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या एकोणविसाव्या वर्धापन दिनानिमीत्त जळगावी होणारे पहिले अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात लेखक प्रा. भास्कर चंदनशिव (कळंब, जि उस्मानाबाद) यांची निवड करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी दिली आहे.
प्रा. भास्कर चंदनशिव यांचे साहित्य महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व विद्यापीठांत अभ्यासक्रम समाविष्ट आहेत. त्यांच्या नावावर आजमितीस एकूण १४ ग्रंथ संपदा प्रकाशित असून त्यात कथा संग्रह, समीक्षा ग्रंथ, संपादने अशी ग्रंथ असून ३ राज्यशासनाचे पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचा पुरस्कार, भैरूरतन दमाणी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहे. तसेच दोन वेळा शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदासह, मराठवाडा साहित्य संमेलन, अस्मिता दर्शन साहित्य संमेलन, मसाप चे साहित्य संमेलन, ग्रामीण साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपदे भूषवलेली असून या संमेलनासाठी अनेक मान्यवर सहकार्य करीत आहेत. पुढील वर्षी हे संमेलन जळगावी होणार असल्याचे मंडळाचे सल्लागार साहेबराव पाटील, सचिव डी बी महाजन, उपाध्यक्ष प्रवीण लोहार यांनी कळविलेले असून संमेलनासाठी लवकरच विविध समित्या स्थापन करण्यात येणार आहे.
सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या वतीने आज दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलन प्रा.डाॅ. द. ता. भोसले, प्रा. डाॅ. तारा भवाळकर, डाॅ. लक्ष्मीनारायण बोल्ली, वामन होवाळ, प्रा. डाॅ. रवींद्र शोभणे, सुधाकर गायधनी, रा.रं.बोराडे, लक्ष्मण गायकवाड, रेखा बैजल, प्रा.डाॅ.यशवंत पाठक, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, संगीता बर्वे, वसंत आबाजी डहाके, प्रा.डाॅ.नागनाथ कोत्तापल्ले, प्रा डाॅ सदानंद मोरे, प्रा डाॅ म.सु.पगारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली असून येत्या मार्च मध्ये अशोक कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली सतरावे संमेलन होणार आहे. तसेच प्रा. डाॅ. किशोर सानप यांच्या अध्यक्षतेखाली अष्टपैलू पद्मश्री डाॅ. भवरलाल जैन एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन तर प्रा. दीपमाला कुबडे प्रायोजित प्रा. डाॅ. सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बालकुमार मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेली आहेत.